कोरोना महामारीमुळे वर्षभर संपूर्ण जनजीवन विस्कळित आहे. कोरोनामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वच नागरिक त्रस्त आहेत. कौटुंबिक गरजा भागवताना सर्वांचीच तारेवरची कसरत करत आहेत. आज वीजपुरवठा अत्यावश्यक असून, कोरोनामुळे बहुतांशी शैक्षणिक कार्य ऑनलाइन सुरू आहे. वीजपुरवठा खंडित झाला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही होणार आहे. अशा स्थितीत वीज जोडणी अत्यावश्यक आहे. पण वीजबिलांच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडण्याची कारवाई वीज कंपनीकडून होत आहे. हा प्रकार निश्चितच वेदनादायी असून कोरोनासारख्या महामारीत वीजबिल थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई होणार असेल. तर ते जनता कदापि मान्य करणार नाही. अशावेळी आम्ही वीज ग्राहकांच्या बाजूने ठाम उभे राहणार आहोत, तसेच कोणाकोणाची वीज तोडली याचा आढावा घेऊन त्याचा जागेवरच सोक्ष मोक्ष लावताना संघर्ष अटळ असेल, असा इशाराही उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.
सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्व कुटुंबातील बहुतांशी कामे ही विजेवर अवलंबून आहेत. कोरोनामुळे लॉकडाउनच्या काळातील तीन-चार महिन्यांची वीजबिले एकत्रितपणे कालांतराने दिल्याने ती भरताना सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन गडबडले आहे. एकत्रित वीजबिल दिल्याने एकूण युनिटचा दर लागला आहे. यामध्ये वीज ग्राहकाचे दुहेरी नुकसान झाले आहे.