नवी मुंबई : गेल्या काही महिन्यात डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती गगनाला भिडल्याने मालवाहतूक दारांचे कंबरडे मोडले आहे. डिझेलच्या किंमती 90 रूपयांच्या घरात गेल्याने 15 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय मुंबई मालवाहतूक टेम्पों महासंघाने घेतला आहे. 1 मार्चपासून भाडेवाढ होणार असल्याने भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा महाग होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि देशभरातून येणारा भाजीपाला मुंबई आणि संपुर्ण उपनगरांना पुरवला जातो. एपीएमसीमधून दिवसाला 2 हजार गाड्या मुंबई, उपनगर, वसई-विरार, कल्याण डोंबिवली, पनवेल भागात पुरवला जातो. मात्र आता या मालवाहतूक दारांनी दरवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सध्या डिझेल 87 रूपयांवर पोहोचल्याने दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्टीकरण मालवाहतूक दार संघटनेने दिले आहेत.
डिझेल 61 रूपये होते तेव्हा ठरवण्यात आलेले टेम्पोभाडे आजही आहे तेच आहे. मुंबई मालवाहतूक टेम्पो महासंघाने येत्या 1 मार्चपासून मालवाहतूक भांड्यात 15 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. डिझेल बरोबर टायर, टोल, इन्शुरन्स, स्पेअरपार्ट, पार्किंग इत्यादी गोष्टीतही गेल्या काही वर्षांत वाढ झाल्याने ड्रायव्हर लोकांचा पगार देणे आणि गाड्यांचे बॅंक हप्ते भरणे मुश्किल झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव भाडेवाढ करावी लागत असल्याने येत्या गुरूवारी होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.