पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आजपर्यंत मौन बाळगलेले मंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर जाऊन आज संत सेवालाल महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, यावेळी मोठ्या प्रमाणात संजय राठोड समर्थकांनी पोहरादेवी गडावर गर्दी केली होती, बंजारा समाजावरील संकट दूर व्हावं यासाठी याठिकाणी यज्ञाचं आयोजन केले होते, त्यानंतर संजय राठोड यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी पत्रकार परिषदेत संजय राठोड म्हणाले की, बंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण या तरूणीचा पुण्यात दुर्देवी मृत्यू झाला, या मृत्यूचा बंजारा समाजाला दु:खं झालंय, मात्र या प्रकरणावरून जे घाणेरडे राजकारण केले जातंय, ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे, मी मागासवर्गीय समाजाचं, ओबीसी, भटक्या कुटुंबातून येऊन नेतृत्व करतो त्यामुळे माझ्या सामाजिक, राजकीय जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या माध्यमातून केला जात आहे, या प्रकरणाचा माझा काहीही संबंध नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तपासाचे आदेश दिलेत, या चौकशीत सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, पण माझी बदनामी करण्यासाठी घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, माझी, कुटुंबाची अन् समाजाची बदनामी करू नका, चौकशीतून जे काही सत्य आहे ते समोर येईल असं त्यांनी सांगितले.