Uncategorized

साहित्याच्या उद्धार !

मी एक साहित्यावर मनःपूर्वक प्रेम करणारा रसिक आहे .त्याचप्रमाणे काही कविता व दोन कवितासंग्रह माझ्या हातून निर्माण झाले आहेत .त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा मी सभासद आहे .साहित्यातले फारसे मला कळते असे नाही परंतु वयाची पंचावन्न वर्ष पार केल्यानंतर मी मराठीतून एम ए झालो असल्यामुळे मला त्यातले थोडेफार कळत असावे असे समजावयास हरकत नाही .मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सभासद असल्यामुळे पंढरपूर येथील सभासदांच्या व्हाट्सअप नामक ग्रुपमध्ये मला एक सभासद करून घेण्यात आले असावे .आज याच व्हाट्सअप ग्रुप मध्ये एक छोटासा लेख माझ्या पाहण्यात आला. त्यामध्ये मसापच्या सर्व पुणे कार्यकारिणीला पाच वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे असे समजले. मी स्वतः मसापचा सभासद असून वार्षिक सर्वसाधारण सभा परवा झाली हे मला आज समजले .कदाचित या सभेला उपस्थित राहण्यासाठी मी लायक आहे असे मसाप ला वाटत नसावे त्यामुळे मला याबद्दल कळवले गेले नसावे. त्यामुळे मला या ऐतिहासिक सभेला उपस्थित राहता आले नाही याचे फार दुःख वाटले नाही .असो!
या मेसेज प्रमाणे निवडणुका घेणे हा पैशाचा, वेळेचा अपव्यय करणे असते असे मला समजले. किंबहुना निवडणूक न होताही आदर्श काम करता येते याचे मला ज्ञान झाले .सध्याची कार्यकारणी इतके चांगले काम करत असताना निवडणुका घेणे व त्यांच्या ऐवजी दुसर्‍या कोणाला तरी कार्यकारणीवर घेणे योग्य नाही हेही मला समजले .साहित्य संमेलनाचा अध्यक्ष सन्मानपूर्वक निवडला जात असताना कार्यकारणी वरील सभासदही सन्मानानेच मुदतवाढ मिळविते झाले ही आनंदाची गोष्ट आहे. त्याकरता त्या सर्वांचे अभिनंदन !
हे सर्व होत असतानाच मला एकाच गोष्टीचे दुःख झाले की मी जर सभेला उपस्थित असतो तर या सर्वांना तहहयात कार्यकारिणीचे सदस्य म्हणून निवडून द्या याचा मला आग्रह धरता आला असता.कारण इतके सर्व चांगले काम करणारे लोक असताना त्या सर्वांना तहहयात कार्यकारिणीवर ठेवणे हे मसापाच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगले झाले असते व प्रत्येक वेळेला निवडणुका करणे , वेळ ,पैसा, वाद-प्रतिवाद या सर्वांना टाळता आले असते. त्याचप्रमाणे ते साहित्य परिषदेच्या व एकुणात मराठी साहित्याच्या दृष्टीने फार चांगले झाले असते असे मला वाटते. असे समजते की काही विरोधकांच्या म्हणण्याप्रमाणे कार्यकारिणीवरील काही सभासद साहित्यिक नसल्यामुळे चांगल्या साहित्यापासून वंचित राहत असतात ,त्यांना तहहयात कार्यकारिणीवर राहिल्यानंतर साहित्याशी जास्त संबंध ठेवता आला असता .असो ! झाले ते बरे झाले असे समजावयास हरकत नाही. पुढील काळासाठी या सर्वांना तहहयात करून त्यांच्या वारसांना वारसाहक्काने कार्यकारिणीवर येण्याची मुभा दिल्यास एकुणातच निवडणूक कायमची टाळता येईल व मराठी साहित्यासाठी सोनेरी दिवस येतील .सांस्कृतिक व नैतिक मूल्य पुनर्स्थापनेसाठ याहून चांगली गोष्ट काय असेल ?
काही लोक या सार्यासाठी विरोध करताना पाहून मला खूप दुःख झाले .त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वत्र निवडणुका होत असताना साहित्य परिषदेची निवडणूक का होत नाही? त्याचप्रमाणे मसाप च्या घटनेत सांगितल्याप्रमाणे दर पाच वर्षांनी निवडणूक व्हायलाच पाहिजे अथवा घटनादुरुस्ती व्हायला पाहिजे , सर्वसाधारण सभेसाठी विशिष्ट लोकांनाच बोलविले गेले होते. वगैरे वगैरे ! या गोष्टी न पटण्यासारख्या आहेत .मसाप मुळे मराठी भाषेची थोरवी किती वाढली आहे हे नियमित मोठ्या संख्येने निर्माण होणार्‍या कवितांच्या निर्मितीमुळे लक्षात येत आहे .मराठी साहित्याच्या निर्मितीसाठी मसापच्या या कार्यकारणीच्या असण्याची किती आवश्यकता आहे हे तथाकथित मराठी साहित्यिकांच्या त्यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे लक्षात येत आहे .किंबहुना तुम्ही साहित्यिक आहात की नाही हेही ही कार्यकारणी ठरवू शकते .त्यामुळे विरोधकांनी आपला विरोध सोडून आपण साहित्यिक आहोत याची मान्यता मिळवण्यासाठी या कार्यकारिणीला पाठिंबा द्यावा असे मला वाटते .
करोना काळामध्ये पोस्टाने मतपत्रिका पाठवणे आणि मत परत मिळवणे हे सर्व मसापला संक्रमणाच्या दृष्टीने अवघड होते, परंतु सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष पुणे येथे भरवणे हे ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे व्यवस्थेपेक्षा सोपे होते त्यामुळे मतदान टाळणे हे योग्य झाले आहे .विरोधकांनी उगाच विरोध करू नये हेच खरे .आजकाल फेसबूक ,युट्युब या माध्यमातून साहित्य जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचत असते,त्याकरिता मसापचे काहीच योगदान नाही असे काही लोकांचे, विरोधकांचे म्हणणे योग्य नाही. त्यामुळे यापुढील काळात मसापचे योगदान मराठी साहित्याच्या उद्धारासाठी खूपच राहणार आहे .तरी सर्वांनी कार्यकारिणीला सहकार्य करावे अशी माझी नम्र विनंती आहे.

प्रशांत वेळापुरे
पाथेय,परदेशी नगर, पंढरपूर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *