गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप खासदाराला काँग्रेस कार्यकर्त्यांची पाठलाग करून मारहाण

उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील सांगीपूरमधील एका कार्यक्रमावेळी भाजपचे खासदार संगमलाल गुप्ता यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षरश: गुप्ता यांचा पाठलाग करत त्यांना प्रचंड मारहाण केली. गुप्ता यांना भररस्त्यात पाडून त्यांना लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतल्याने हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच ही मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. 

सांगापूर विकास खंड येथे एका आरोग्य शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला खासदारल संगमलाल गुप्ता उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी आणि आमदार आराधना मिश्रही उपस्थित होते.

मात्र, यावेळी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अचानक बाचाबाची सुरू झाली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या कार्यक्रमाला काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांवर वरचढ ठरले. या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना पाठलाग करून मारहाण केली.

कायदा सुव्यवस्था फरार

दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी सुरू झाल्याने खासदार गुप्ता यांनी घटनास्थळावरून पळ काढला. जीव वाचवण्साठी तेही पळत सुटले. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुप्ता यांच्या मागे धावत त्यांना जोरदार मारहाण केली. मारहाण करणारा हा जमाव नव्हता तर ते काँग्रेसचे कार्यकर्तेच होते, असा दावा भाजपने केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर माजी मुख्यमंत्री आणि सपाचे नेते अखिलेश यादव यांनी ट्विट केलं आहे. भाजप सरकारने ज्या प्रकारे हिंसेचं समर्थन केलं आहे.

हिंसेला प्रोत्साहन दिलं आहे, त्याचा आज खासदार आणि आमदारांना फटका बसला आहे. हे सरकार त्यांच्या खासदारांनाही संरक्षण देऊ शकत नाही. भाजपच्या व्यवस्थेत कायदा सुव्यवस्था फरार आहे. जनआक्रोशाचं हिंसेत परिवर्तन होणं कधीही चांगलं नसतं, असं ट्विट यादव यांनी केलं आहे.
हल्लेखोरांना सोडणार नाही

या हल्ल्यात तीन वाहनांचं नुकसान झालं आहे. या हल्ल्यात पोलीसही जखमी झाले आहेत. तर गुप्ता यांनाही मार लागला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप गुप्ता यांनी केला आहे. मी कार्यक्रमस्थळी आलो. मंचावर आल्यावर पोलिसांना लोक मारत असल्याचं मी पाहिलं. त्यावेळी हे काय करत आहात म्हणून मी सवाल केला.

त्यानंतर या लोकांनी मलाच मारहाण करायला सुरुवात केली. आमच्या गाड्या फोडल्या. आमच्या कार्यकर्त्यांना खाली पाडून हल्ला केला, असं गुप्ता म्हणाले. दरम्यान, हल्लेखोरांना सरकार सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्या यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *