राज्य विधिमंडळात ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेच्या चौकशीचे आदेश निघाले असून यासाठी १६ आमदारांच्या विशेष चौकशी समितीही घोषणा करण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यात जुलै २०१९ मध्ये वनविभागाकडून ८५ लाख ५२ हजार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते व यासाठी ९० लाख रोपांची निर्मितीही करण्यात आली होती. वन विभागाच्या नियोजनातून हाती घेतलेल्या या वृक्ष लागवड योजनेत पंढरपूर तालुक्यातील विविध शासकीय विभाग,ग्रामपंचायती आणि पंढरपूर नगर पालिका यांच्या माध्यमातूनही वृक्षारोपणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.मात्र वृक्षलागवडीची हि मोहीम सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱयात सापडली होती.वृक्ष लागवडीची आकडेवारी वनविभागाकडून व विविध विभागाकडून सादर करण्यात आली होती तरीही प्रत्यक्षात किती रोपे जगली हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच होता.आणि पर्यावरण प्रेमींकडून या बाबत नाराजी व्यक्त होत होती.
आता या लागवडीची चौकशी होणार असून या योजने अंतर्गत पंढरपूर तालुक्यात कुठे किती रोपे लावण्यात आली,या पैकी किती रोपे जागविण्यात आली याचीही चौकशी झाली पाहिजे अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त होताना दिसून येत आहे. पंढरपूर वनविभागाच्या कासेगाव रस्त्यावरील जमिनीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली होती त्या बाबतही प्रश्नचिन्ह असून नमामि चंद्रभागा योजनेच्या माध्यमातूनही विविध औषधी रोपांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले होते.त्याचे पुढे काय झाले हा प्रश्नही अजून अनुत्तरित आहे.