दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी पहाटे पंढरपूर येथील भोसले चौकात काशीकापडी समाज बांधवांच्या जुन्या कपड्यांच्या गोडाऊनला अचानक मोठी आग लागली होती. या आगीत काशीकापडी समाजातील महिला भगिणींचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. ही आग लागली का लावली गेली? हा प्रश्न निर्माण होत असुन याची सखोल चौकशी व्हावी आणि आगीमुळे नुकसान झालेल्या काशीकापडी समाजातील महिला भगिणींना नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी काशीकापडी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
काशीकापडी समातील महिला भगिणींचा जुने कपडे विकण्याचा पारंपारिक व्यवसाय असुन गेल्या 200 वर्षांपासुन सदर समाज पंढरीतील कर्नल भोसले चौक येथे जुने कपडे विकण्याचा व्यवसाय करत आहे. गोरगरीबांना नवीन कपडे घेणे परवडत नाही त्यामुळे अनेक गरजु गरीब बंधु-भगिणी येथून जुने कपडे खरेदी करत असतात. रात्रीच्या वेळी कर्नल भोसले चौकानजीकच व्यापारी कमिटीच्या गोडाऊनमध्ये जुने कपडे ठेवले जातात. याच गोडाऊनला आग लागल्याने काशीकापडी समाजातील महिला भगिणींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना घडून बरेच दिवस उलटून गेले तरीही अद्याप याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही.
या आगीसंदर्भात प्रशासनाकडून सखोल चौकशी होऊन, याचे नेमके कारण शोधुन काढावे व नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानग्रस्त महिला भगिणींना तातडीने शासकीय मदत मिळावी. ही आमची मागणी असुन जर याची दखल लवकरात लवकर घेतली गेली नाही तर समाज बांधवांसोबत लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु. असा इशाराही श्रीनिवास उपळकर यांनी दिला आहे









