ताज्याघडामोडी

शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन घडवला चमत्कार

भिवंडी तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असताना वळ, अलिमघर आणि निवळी या तीन ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली असून आश्चर्यकारक बाब म्हणजे यासाठी शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.

सध्या राज्यात शिवसेना आणि भाजपा कट्टर वैरी झाले असून रोजच एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असतात. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते विरोधात असतानाही वळ आणि अलिमघर गावात शिवसेना आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक  बिनविरोध करून दाखवली आहे.

वळ या गावात तर केव्हाच बिनविरोध निवडणूक झाली नाही. मात्र कोरोनाच्या काळात मदतीसाठी धावणाऱ्या गावातील नागरिकांना एकत्र पाहून  सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील आणि माजी सरपंच रामदास भोईर यांचे कार्यकर्ते एकत्र आले. गावच्या विकासासाठी एकत्र आलेच पाहिजे, यासाठी या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन गावातील सर्वांना एकत्र केलं. तसंच निवडणुकीत होणारी भांडणं, वाया जाणारा पैसा, वाद, विवाद विसरून आणि महत्वाची बाब म्हणजे शिवसेना आणि भाजपा पक्षाची युती करून येथील पंचक्रोशीतील गावासमोर आदर्श ठेवण्यासाठी प्रयत्न केला आणि वळ ग्रामपंचायत बिनविरोध निवडून केली आहे.

ग्रामपंचायतीवर गावातील नागरिकांना सरपंच बनवणे हा मुद्दा महत्वाचा असून सहा महिन्यासाठी तरी सरपंच बनवून हुशार, कलावंत, तरुणांना मान मिळणे गरजेचे आहे. अशा तरुणांच्या नावाची पाटी ग्रामपंचायतीवर लागलीच पाहिजे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असं सेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *