Uncategorized

शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांच्या पंढरपुरातील संपर्क कार्यालयाचे रविवारी प्रा.शिवाजी सावंत यांच्या हस्ते उदघाटन

गेल्या तीस वर्षाच्या सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने अनेक चढउतार पाहिले असून जेव्हा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात प्रस्थापितांच्या वर्चस्वाचे राजकारण सुरु होते तेव्हा सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना संघर्ष करीत आलेली आहे.सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पूर्वी कॉग्रेस आणि पुढे कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेसचे वर्चस्व असल्याचे चित्र रंगवले जात असले तरी जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देत विजयी झाल्याचे दिसून आले आहे.पक्षीय राजकारणाचा स्थानिक पातळीवरील लेखाजोखा घेतला असता एकवेळ गावात कॉग्रेस-राष्ट्रवादी कॉग्रेस अथवा भाजपच्या शाखेचा बोर्ड दिसून येत नाही मात्र गावागावात दोन भगव्या झेंड्यांच्या मध्ये शिवसेना शाखेचा बोर्ड मात्र अस्तित्वाची जाणीव करून देत उभा असलेला दिसून येत असे.आता राज्यात मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या पदावर आरूढ आहेत.त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या शिवसेना,शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक यांच्याकडून व्यक्त होताना दिसून येत आहे.आणि सर्वसामान्य जनतेशी व समस्याग्रस्त महिला वर्गाशी सहजसुलभ संपर्क झाला पाहिजे यासाठी शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांच्या भक्तिमार्ग येथील संपर्क कार्यालयाचे उदघाटन रविवार दिनांक १० जानेवारी २०२१ सकाळी ठीक १० वाजता शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे,माजी जिल्हा प्रमुख साईनाथ अभंगराव,शिवसेना महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख संजनाताई घाडी हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत.     

      सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एक अभ्यासू आणि आक्रमक जिल्हा परिषद सदस्या म्हणून जशी शैला गोडसे यांनी आपली  वेगळी ओळख निर्माण केली आहे त्याच प्रमाणे शिवसेनेच्या माध्यमातून महायुती सरकाराच्या सत्ताकाळात व आता महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शैला गोडसे या सर्वसामान्य जनतेशी निगडित अनेक महत्वपूर्ण विषयासाठी शासनदरबारी पाठपुरावा करताना दिसून आल्या आहेत.मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी तलाव अथवा ३५ गावचा पाणीप्रश्न असो त्यांनी विविध प्रकारे केलेली आंदोलने आणी पाठपुरावा पाहता एक सक्षम महिला नेतृत्व असल्याची साक्ष त्यांनी आपल्या कृतीतून दिली आहे.तर कृष्णा-भीमा स्थिरीकरणा साठी त्यांनी केलेले आंदोलन आणि मांडलेली अभ्यासपूर्ण भूमिका निश्चितच प्रशंसेचा विषय झाली होती.पंढरपूर शहरातील संपर्क कार्यालयाच्या औचित्या बाबत विचारणा केली असता सर्वसामान्य जनतेला,माता-भगिनींना सहज सुलभ संपर्क करता यावा हाच हेतू असल्याचे सांगत अधिकाधिक संपर्कातून जास्तीत जास्त लोकांच्या समस्या सोडविणे हेच ध्येय असल्याचे पंढरी वार्ताशी बोलताना सांगितले.       

      २०१४ मध्ये महायुतीच्या माध्यमातून शिवसेना सत्तेत सहभागी झाली खरी पण सोलापूर जिल्ह्यात करमाळा विधानसभा मतदार संघाचे नारायण पाटील हे जिल्ह्यातून शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणून  प्रतिनिधित्व करीत होते आणि महायुतीच्या सत्ताकाळात सोलापूर जिल्ह्यात निर्णय प्रक्रियेत शिवसेनेवर अन्याय होतोय अशीच भावना सामान्य शिवसैनिक व शिवसेना समर्थकांकडून व्यक्त होत होती.मात्र आता महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात थेट मुख्यमंत्री पद हे शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे सांभाळीत असताना सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षापूर्तीची मोठी जबाबदारी जिल्हा शिवसेनेवर असून यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांचे संपर्क कार्यालय नक्कीच महत्वपूर्ण भूमिका पार पाडेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *