Uncategorized

”विठ्ठल”च्या चेअरमनपदासाठी भगीरथ भालके यांच्या नावास बहुतांश संचालकांची संमती ?

          विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून २००२ ते २०२० असे १८ वर्षे प्रदीर्घकाळ जबाबदारी पाडत असतानाच विठ्ठल कारखान्याच्या चेअरमन आमदार झाला पाहिजे हे  ३० वर्षांपासूनचे विठ्ठल परिवाराने पाहिलेले स्वप्न स्व. भारत भालके यांनी २००९ मध्ये पूर्ण केले होते आणि सातत्याने तीन टर्म पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार म्हणून ते लोकप्रिय ठरले होते.दुर्दैवाने कोरोनाच्या आजराचा सामना करीत असतानाच २७ नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले.त्यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदाची जबाबदारी स्व.आ.भारत भालके यांचे पुत्र व कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांच्यावर सोपविली जावी अशी अपेक्षा स्व.आ. भालके सर्मथकांमधून होताना दिसून आली.२१ डिसेंबर रोजी विठ्ठलाच्या चेअरमन पदाची संचालक मंडळातून निवड करण्याचे जाहीर झाले मात्र याच दरम्यान गेल्या महिनाभरापासून बरीच चर्चा आणि अफवांचा बाजार गरम झाल्याचे दिसून आले.पण साऱ्या अफवा बाजूला सारत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने एकमताने भगीरथ भालके यांच्या नावाला संमती दिल्याची खात्रीदायक माहिती मिळाली असून सोमवारी भगीरथ भालके यांची निवड झाल्याची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे समजते.   
         विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास आर्थिक अडचणीमुळे गतवर्षी आपला गळीत हंगाम बंद ठेवावा लागला होता.त्या पाठीमागची करणे आणि आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले होते.विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास राज्यात सत्तेवर तत्कालीन भाजपा सरकारच्या खपामर्जीचा सामना करावा लागला,वेळेत राज्य शासनाकडून थकहमी मिळाली नाही त्यामुळे कारखाना सुरु करता आला नाही या स्व.आमदार भारत भालके यांनी केलेल्या खुलाशामुळे कारखान्याचे बहुतांश सभासद आ.भालके यांच्यावर विश्वास ठेवत त्यांच्या पाठीशी ठाम राहिले असल्याचे चित्र पहावयास मिळाले.राज्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर डिसेंबर २०१९ मध्ये म्हणजे दोनच महिन्यात विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास थकहमी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आणि अशा प्रकारचा निर्णय थकहमी बाबतचा एकाच कारखान्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पहिल्यांदाच घेतला गेला होता.पुढे राज्य सहकारी बँकेच्या प्रशासकीय प्रशासनाकडून जाचक अटीची अडचण येऊ लागल्यानंतर स्व.आ.भारत भालके यांनी  एप्रिलमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दुरुस्त करून निर्णय घेण्यास भाग पाडले होते.पण या साऱ्या घडामोडीत कारखान्याचा सिझन हातचा निघून गेला होता.       
          कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ठप्प झालेला मंत्रालयातील करभार,थंड पडलेली प्रशासकीय यंत्रणा या साऱ्या अडचणींना बाजूला सारत अंत्यविधीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितल्या प्रमाणे आ.भालके यांनी पैसे उपलब्ध करून कारखाना सुरु करण्यासाठी आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष केले,केवळ विठ्ठल सहकारीच नाही तर सहकार शिरोमणी आणि भीमा सहकारी साखर कारखान्यांना ही शासनाची थकहमी मिळावी म्हणून शासनदरबारी मा.खा.धनंजय महाडिक व चेअरमन कल्याणराव काळे हे जरी भाजपात असले तरी प्रयत्न केला.आता विठ्ठल सहकारी सुरु झाला पण चेअरमनपदाची धुरा सांभाळणारे भारतनांना गेले.  
          त्यांच्या पश्चात कारखान्याच्या चेअरमनपदची धुरा भगीरथ भालके यांच्यावर सोपविली जाईल असा विश्वास स्व.आ.भारत भालके समर्थकांकडून व्यक्त केला जात होता तर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बहुतांश सभासदांचा यास पाठींबा असल्याचेही दिसून येत होते.२१ डिसेंबर रोजी होणाऱ्या चेअरमन निवडीकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागले असतानाच विविध चर्चा आणि अफवा यामुळे वेगवेगळ्या नावे चेअरमनपदासाठी पुढे येताना दिसून येत होती.भालके कुटूंबियांच्या सात्वनपर भेटीसाठी जेष्ठ नेते शरद पवार हे सरकोली येथे आले असता जनसमुदाया समोर विठ्ठल कारखान्याबाबत बोलताना त्यांनी आपल्याला सर्वाना सोबत घेऊन जायचे आहे असे सूचक वक्तव्य कल्याणराव काळे यांचा नामोल्लेख करून केले होते.त्याच वेळी जनसमुदायाततुन भगीरथ भालके यांच्या नावाचा पुकारा झाल्यानंतर तुमच्या जे मनात आहे तेच होईल असे सूचक विधानही खा.शरद पवार यांनी केले होते.     
           पंढरी वार्तास मिळालेल्या माहितीनुसार आज रविवारी संचालक मंडळाच्या चेअरमन निवडी पूर्वीच्या बैठकीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक युवराज पाटील यांनी कारखाना आणि आमदारकी हे दोन पदे वेगळी असली पाहिजेत अशी भूमिका मांडत चेअरमनपदासाठी भगीरथ भालके यांनी माझे नाव सुचवावे असा आग्रह धरला असल्याचे समजते.जर हा निर्णय झाला नाही तर पुढे आमचा मार्ग आम्हाला मोकळा असल्याचा इशाराही त्यांनी दिल्याची माहिती असून मात्र या बाबत वेगळे काही होणार नाही अशीच भूमिका घेत भगीरथ भालके यांच्या नावास बहुतांश संचालकांनी पाठींबा दर्शविल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *