शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदाचा शैला गोडसे यांनी दिला राजीनामा
आ.तानाजी सावंत यांना मंत्री न केल्याने व्यक्त केली नाराजी
शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैला गोडसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे.नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्हा संपर्कप्रमुख व माजी कॅबिनेट मंत्री आमदार डॉ.तानाजीसावंत यांची निवड केली नाही याचे दुःख झाले आहे. गोरगरिबांना, शेतकरी /कष्टकरी ,वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा पक्ष म्हणून शिवसेना पक्षाकडे बघितले जाते तसेच दिलेल्या शब्दाला जागणारा नेता म्हणून आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये रोखठोक व धाडसी नेतृत्व असलेले डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दोन वर्षापासून शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक म्हणून मी जबाबदारी पार पाडीत आहे.मागील काही वर्षांमध्ये आपल्याकडून तानाजीराव सावंत साहेबांना ताकद देण्याचा प्रयत्न झाला .आपण कमी कालावधी साठी का होईना त्यांना थेट कॅबिनेट मंत्री केले आपण दिलेल्या ताकदीचा उपयोग आम्हाला सावंत साहेब यांच्या माध्यमातून पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत होता. त्यानी सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या प्रश्नासाठी उपोषणे केली, आंदोलने केली, रास्ता रोको केले, पक्ष उपयोगी अनेक कार्यक्रम राबवले मात्र मंत्री मंडळांमध्ये आमदार तानाजीराव सावंत साहेबांना स्थान मिळू शकले नाही त्यामुळे आम्हाला पोरके झाल्यासारखे वाटत आहे असे शिवसेना भवनला पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करूनही संधी मिळाली नाही त्यापेक्षा जास्त दुःख आ. तानाजीराव सावंत यांचा मंत्री मंडळांमध्ये समावेश न झाल्याने झाले आहे अशी भावनाही या राजीनामा पत्राद्वारे शैला गोडसे यांनी प्रकट केली आहे.