दारू पिण्यास सक्त मनाई असलेल्या ढाब्यांवरीलफलकांची आज अग्निपरीक्षा !
दारूबंदी अधिनियम कलम २५ मधील सुधारणेची अमलबजावणी होणार ?
अवैध दारू विक्री आढळून आल्यास हद्दपारीची तरतूद
जिल्ह्यातील अनेक हॉटेल, ढाब्यांवर खुलेआम दारू विक्री केली जात असल्याचे प्रकार घडत असून त्याच बरोबर अनेक ढाबेचालक हे येथे दारू पिण्यास सक्त मनाई असल्याचे फलक लावून त्या खालीच दारू पीत बसलेल्या ग्राहकाची बडदास्त ठेवताना दिसून येतात.ही बाब लक्षात घेऊनच अवैध दारूविक्रीस आळा बसावा या हेतूने राज्य शासनाने दारूबंदी कायदा 1949 मध्ये दुरुस्ती करून नोव्हेंबर २०१७ मध्ये कलम 25 मध्ये सुधारणा केली.या नुसार अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना हद्दपार केले जाऊ शकते. ३१ डिसेंबरच्या पार्शवभूमीवर उत्पादन शुल्क विभाग सतर्क असल्याचे चित्र निर्माण करीत असला तरी पंढरपूर तालुक्यातील अनेक ढाबे हे केवळ दारू पिण्याचे अड्डे झाले आहेत.या बाबत ग्रामीण भागातून नाराजी व्यक्त होत असली तरी तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नसल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांना रान मोकळे झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात महामार्गालगत व ग्रामीण भागात अलीकडच्या काळात छोट्या व मोठ्या हॉटेल आणि ढाब्यांची संख्या सातत्याने वाढत आहे, फक्त जेवणाची विक्री करून फारसा नफा मिळत नसल्याने यापैकी अनेक छोट्या-मोठ्या हॉटेलवर सर्रासपणे बेकायदेशीररीत्या दारूची विक्री केली जाते,हॉटेल चालकांनी बार व परमिट रूमचे कायदेशीर परवाने घेतल्यास त्यांना शासनास कर द्यावा लागतो, पण हा कर चुकविण्यासाठी काही हॉटेल चालक कायदेशीर परवाने घेण्यापेक्षा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची अधून मधून होणारी कारवाई आर्थिक दृष्ट्या जास्त फायद्याची ठरते.आणि अनेक वेळा केलेली कारवाई,जप्त केलेली दारू आणि प्रत्यक्ष दाखविण्यात आलेले आरोपी हा सारा संमत्तीचा मामला असतो अशीच चर्चा होताना आढळून येते.
ग्रामीण भागात बेकादेशीर दारू विक्री होत असलेल्या ढाब्यांवर तळीराम व ढाबे चालक यांच्यात अनेकदा वादावादी होऊन भांडणातून गंभीर गुन्हे घडत असतात. अशावेळी हॉटेल्स, ढाबे चालकांवर गुन्हे दाखल होण्याऐवजी केवळ दारू पिणाऱ्यांवरच पोलीस गुन्हे दाखल होताना दिसून येतात.
दारू बंदी अधिनियमात केलेल्या बदलामुळे अवैध दारू विक्री करत असनाऱ्या एका व्यक्तीवर तीन गुन्हे दाखल झाल्यास त्यांच्यावर दोन वर्षासाठी जिल्हा हद्दपारीची कारवाई होऊ शकते .गावात अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती ग्रामसुरक्षा दलाने पोलिसांना किंवा उत्पादन शुल्क यंत्रणेला दिल्यानंतर १२ तासाच्या आत कारवाई करणे बांधकारक आहे .
दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाला नियमित लाखो रुपये कर भरणारे व प्रचंड आर्थिक गुंतवणूक करून उभारलेले बार ओस पडू लागले आहेत. त्यामुळे बार मालकांना मात्र कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. कायदेशीर परवाना घेऊन सुरु असलेल्या बारच्या ठिकाणी फारसा ‘स्वतंत्र महसूल’ मिळत नसल्याने बार चालकांनी नाराजी व्यक्त करून देखील बेकायदेशीर दारू विक्रेत्यांवर व दारू पिण्याचे ठिकाण झालेल्या ढाब्यांवर कारवाई होताना दिसत नाही.मात्र दारू विक्री करणाऱ्या अथवा दारू पिण्याचे अड्डे झालेल्या ढाबेचालकांमुळे वाईन शॉप चालकांची मात्र चांदी होत असून अवैधरित्या दारू विक्री करणे, अल्पवयीन मुलांना दारूची बाटली देणे, परवाना नसलेल्या लोकांना दारू पुरवठा करणे, 19 वर्षाखालील तरुणांना दारू देने, पहाटेच दुकाने उघडणे, दारूची ठोक विक्री करणे,अवैध दारू विक्री करणार्यांना नियमाचे उल्लंघन करीत वाईन शॉप मधून दारु विक्री करणे तसेच इतरही नियमांना ढाब्यावर बसवून अनेक वाईन शॉप मधून दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. याबाबत उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे.