एक नाही, दोन नाही तर तीन लग्न. जेव्हा पतीला आपल्या तीन बायकांचा खर्च उचलता येत नव्हता तेव्हा त्याने चोरी करण्यास सुरुवात केली. ही फिल्मी कथा नसून कानपूरमधील एका व्यक्तीच्या आयुष्यातील खरी कहाणी आहे. कानपूर पोलिसांना मोठे यश मिळाले असून एका चोरट्याला त्याच्या टोळीसह पोलिसांनी पकडले आहे. अनेकदा पोलीस अशा चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करतात तेव्हा चोरीच्या अनेक कथा समोर येतात. अशीच एक विचित्र घटना शुक्रवारी उघडकीस आली.
एडीसीपी पश्चिम आकाश पटेल कानपूरच्या चौबेपूरमध्ये पकडलेल्या चोरांच्या प्रकरणी पत्रकार परिषद देत होते. परिषदेत पोलिसांनी दिलेले कारण धक्कादायक होते. पकडलेला चोरटा अमित याने तीन लग्न केले होते. आपल्या तीन बायकांचा खर्च भागवण्यासाठी आणि शौक पूर्ण करण्यासाठी तो अनेक वर्षांपासून चोरी करत होता. आरोपीवर विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून अनेक गुन्ह्यांमध्ये तो तुरुंगात गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लागोपाठ तीन घरात चोरीच्या घटना घडल्या. यावर पोलिसांनी पश्चिम विभागाच्या निगराणी पथकासह वेगवेगळी पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी तीन गुन्हेगारांना पकडले. पोलिसांनी चोरट्यांकडून मोठ्या प्रमाणात दागिने, रोख अडीच लाख रुपये, टीव्ही, २३ मोबाईल फोन आणि इतर अनेक मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. चोरटे डॉक्टरांच्या स्विफ्ट डिझायर कारचा वापर करून ग्रामीण भागात रेकी करत असत.
त्यानंतर निर्जन घरे किंवा ज्या घरांमध्ये जास्त पैसे व सामान मिळण्याची शक्यता असते अशा घरांना लक्ष्य करायचे, असेही तपासात समोर आले आहे. एडीसीपी आकाश पटेल यांनी सांगितले की, आरोपींनी भाड्याने कार घेतली होती आणि नियोजनानुसार ते त्याच कारमध्ये चोरी करायचे. त्यांचा जुना गुन्हेगारी इतिहास आणि त्यांनी आतापर्यंत किती चोरी केल्या आहेत याची माहिती मिळावी यासाठी अन्य जिल्ह्यातही त्यांच्याविरुद्ध तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.