गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गावात त्रास देणाऱ्या गुंडाला गावकऱ्यांनीच संपवला, लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून हत्या

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. तालुक्यातील सेलू (मुरपाड) येथे गावकऱ्यांनी मिळून एका गुंडाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चौघांना अटक केली आहे. पोलीस इतर गावकऱ्यांचा शोध घेत आहेत.

झाले असे की, आकाश उल्हास उईके (वय ३०) हा गुंड चार दिवसांपूर्वी कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याच्यावर गुंडगिरीसह चोरी व दहशतीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. बुधवार, ९ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास तो गावातील एका दारूच्या दुकानावर दारू घेण्यासाठी गेला. मात्र तेथे त्याला दारू मिळाली नाही. त्यानंतर त्याने गावातील लोकांना त्रास देणे सुरू केले. या दरम्यान त्याची एका युवकाशी वादावादी झाली.

या युवकाशी वाद घालतच तो गावातल्या ग्रामपंचायतीसमोरील चौकात पोहचला. तेथे काही लोक जमा झालेले होते. त्याने त्यांच्याशीही वाद घालायला सुरुवात केली. त्याचे हे असे वागणे नेहमीचेच होते. यामुळे त्या जमावाला राग आला आणि त्यांनी त्याच्याशी हाणामारी सुरू केली. जमावाने त्याला विटांनी आणि लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

गेल्या महिन्यात, वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. येथे आजारपणामुळे मृत्यू झालेल्या मुलीचा मृतदेह पुरण्यासाठी पैसे नसल्याने आई-वडिलांनी घरातच मृतदेह पुरल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे, ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह पुरला, तेथेच तिचे वडील फळी टाकून झोपायचे. मृत्यूच्या तब्बल १० दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मृत मुलीचे आई, वडील आणि भावाला ताब्यात घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *