अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बरं झालं देशद्रोह्यांबरोबचं चहापान टळलं, असं म्हणत टीका केली. यावर विरोधी पक्षाने मुख्यमंत्री आम्हाला देशद्रोही म्हणाले, असा आरोप करत त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली.त्यावर बुधवारी ( २ मार्च ) मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेत खुलासा केला. विरोधी पक्षाला नव्हे तर, नबाव मलिकांना देशद्रोही संबोधल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला आहे. “महाविकास आघाडी सरकार बनल्यावर नबाव मलिक मंत्री झाले. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी हरकत घेतली नाही. तेव्हा दाऊदचा संबंध दिसला नाही,” असा सवाल शशिकांत शिंदेंनी उपस्थित केला आहे.
विधानपरिषदेत बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, “महाराष्ट्रात चित्र रंगवलं जातं, काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जायचं नसल्याने आम्ही बाहेर पडलो. पण, मी साक्षीला आहे, सरकार बनवत असताना काही घडामोडी घडल्या, तेव्हा एकनाथ शिंदेंनी आमदारांना आणण्यात पुढाकार घेतला होता. तेव्हा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली.”
“एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकार बनवण्यामध्ये फार आग्रही होते. सरकार बनल्यावर नवाब मलिक मंत्री झाले. नवाब मलिक मंत्री झाल्यावर हरकत घेतली नाही. तेव्हा दाऊदचा संबंध दिसला नाही. त्यावेळी मलिक देशद्रोही असल्याचं कळलं नाही. मलिकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असताना कॅबिनेटमध्ये एकमेकांच्या बाजूला मांडीला-मांडी लावून बसत होते,” असा हल्लाबोल शशिकांत शिंदेंनी एकनाथ शिंदेंवर केला.