ताज्याघडामोडी

राज्यात मास्क सक्ती नाही; कोरोना वाढत असल्याने सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याचे आरोग्यमंत्र्याचे आवाहन

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्क सक्ती लागू करण्यात आल्याची चर्चा आज सकाळपासून सुरू झाली होती. यासंदर्भात एक सूचना पत्र देखील व्हायरल झाले होते.

यासंदर्भात आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, राज्यात मास्कची सक्ती नाही. मास्क सक्ती विषयी चर्चा सुरू असली, तरी राज्यात मास्कसक्ती नाही. रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ नये, यामुळे खबरदारी म्हणून मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आल आहे, असे यावेळी टोपे म्हणाले. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट दोन दिवसीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या वेळी टोपे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

राज्यातील मुंबई, पुणे, पालघर आणि रायगडचा काही भाग, तसेच ठाणे या भागात थोडीफार रुग्णसंख्या वाढत आहे. त्याला अनुसरून देशाच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या लोकांनी पत्र पाठवले आहे की, या विभागांसाठी तुम्हाला रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या बाबतीत टास्क फोर्सच्या बैठकीत स्पष्टपणे ठरले की जिथे गर्दीची ठिकाणे आहेत, तिथे मास्क वापरण्याचे आवाहन करावे. ते सक्तीचे नाही असे यावेळी राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील काही भागांमध्ये रुग्णसंख्या जरी वाढत असली तरी पुढील १५ ते २० दिवस परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच मास्कसक्तीबाबत निर्णय घेतला जाईल, असे देखील राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. रुग्णसंख्या जरी या भागांमध्ये वाढत असली, तरी रुग्णालयात दाखल होण्याच्या प्रमाणात नगण्य वाढ झालेली आहे. त्यामुळे घाबरून जाण्यासारखी परिस्थिती अजिबात नाही. जे लोक पॉझिटिव्ह होत आहेत, ते त्यांच्या प्रतिकारशक्तीच्या जोरावरच 8 दिवसात बरे होत आहेत असे माझे निरीक्षण आहे. असे देखील यावेळी टोपे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *