औरंगाबाद शहरात ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने आपल्या भाऊजीला औरंगाबाद-पुणे महामार्गावर दहेगाव बंगलाजवळ इसारवाडी फाटा येथे भररस्त्यात कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण खून केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर खून केल्यानंतर रस्त्यावर जल्लोष करून मोटर सायकलवरून पसार झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली आहे.
बापू खिल्लारे असे मृत झालेल्या तीस वर्षीय युवकाचे नाव आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वाळुंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी गेलेल्या दिशेने पोलीस पथके रवाना केली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, घटनास्थळी साहाय्यक पोलीस आयुक्त अशोक थोरात यांनी भेट दिली. प्राथमिक माहितीनुसार आरोपीने बहिणीला पळवून नेल्याचा रागातून आपल्याच भाऊजीची हत्या केल्याचे कारण समोर आले आहे. औरंगाबाद शहरात दिवसभरात ही दुसरी खुनाची घटना उघडकीस आल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सैराट खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, आरोपीची विचारपूस वाळुंज पोलीस करत आहेत.