कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्काअस्त्राचा प्रभावी वापर करीत सराईत टोळ्यांचा बिमोड करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत साळवे टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 81 टोळ्यातील 623 हून अधिक गुंडांची कारागृहात रवानगी करून गुन्हेगारीचे वंâबरडे मोडले आहे. निलेश उर्फ पिन्या संजय साळवे (वय 21), ओमकार उर्फ डब्या विनोद जगधने (वय 21), निखिल उर्फ पप्या संजय साळवे (वय 20) अशी मोक्कानुसार कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
निलेश उर्फ पिन्या साळवे टोळी प्रमुख असुन त्याने साथीदारांसह येरवडा परिसरात दहशत निर्माण केली होती. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह गंभीर दुखापत, बेकायदेशीर हत्यारे जवळ बाळगण्याचे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्याविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यासाठा वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी पोलीस उपायुक्त रोहीदास पवार यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त रोहीदास पवार, एसीपी किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांनी केली
सराईत 81 टोळ्यांतील गुन्हेगार जेरबंद
नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून गुन्हेगारी करणाऱ्या सराईत टोळ्यांविरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का कारवाईवर भर दिला आहे. त्यानुसार आतापर्यंत 81 टोळ्यांतील 623 पेक्षा अधिक सराईतांची वेगवेगळ्या कारागृहांत रवानगी केली आहे. त्यामुळे शहरात कायदा-सुव्यवस्था सुरळीत होण्यास मदत झाली असल्याचे त्यांनी सांगितले.