शाळेत पोहोचण्यास 5 मिनिटे उशीर झाला म्हणून शाळेच्या मुख्याध्यापकाने उशीरा आलेल्या शिक्षिकेच्या दोन कानशिलात लगावल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे.
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील पसियापुरा गावात असणाऱ्या ज्युनियर हायस्कूल मध्ये सातवी आणि आठवी इयत्तेच्या परीक्षा सुरु होत्या. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक शाळेत आधीच हजर झाले होते.
शाळेतील एक शिक्षिका शाळेत 5 मिनिटे उशिरा पोहोचल्या. यावर मुख्याध्यापकांनी नाराजी व्यक्त केली. उशिरा येण्यावरून शिक्षिका आणि मुख्याध्यापकांमध्ये शाब्दीक चमकक उडाली होती. यावेळी मुख्याध्यापकांनी शिक्षिकेच्या थेट दोन कानशिलात लगावल्या.
ही घटना शाळेच्या सर्व शिक्षकांना कळताच त्यांनी यासंदर्भात एक बैठक बोलावली. बैठकीदरम्यान शिक्षकांनी मुख्याध्यापकांना माफी मागण्यास सांगितले. इतकंच नाही तर ज्या शिक्षिकेला त्यांनी कानाखाली मारली होती तिला बुटाने मुख्याध्यापकांना हाणायलाही लावले. जोड्याने मुख्याध्यापकांना हाणल्यानंतर शिक्षिकेला बरं वाटलं आणि हा वाद संपला.
याबद्दल पसियापुरा गावातील सरपंच म्हणाले कि झालेला प्रकार निंदनीय आहे. शिक्षक व मुख्याध्यापकांमध्ये हाणामारीचे प्रकार घडल्यास विद्यार्थ्यांमध्ये चुकीचा संदेश जातो. यावेळी मुख्याध्यापक संजय व शिक्षिका गीता यांनी सांगितले कि आमच्यात समझोता झाला असून यापुढे अशा घटना शाळेत घडणार नाहीत. दोघांमध्ये समझोता झाल्याने पोलिसांनी देखील कोणतीच कारवाई केली नाही.