भुवैकुंठ पंढरी नगरीत आपल्या परंपरेची वारी पोहचवण्यासाठी आलेले वारकरी पिढयानपिढया येथील परंपरागत मठ/फड येथे वास्तव्यास असत आपल्या गुरुगृही वारीच्या काळात वास्तव्य करावयास मिळने हे आपले थोर भाग्य आहे अशीच परंपरागत धारणा होती.मात्र पुढे गावोगावी भजनी मंडळांची संख्या वाढली,भजनसम्राट किर्तनसम्राट झाले त्यातुनच पुढे काही दिंडीचालक झाले आणि त्यानंतर पंढरीत आपलाही मठ असावा अशी भावना गावोगावच्या दिंडीचालकांकडुन व्यक्त होऊ लागली.मात्र पुढे यातही काही अनिष्ट प्रवृत्तींचा शिरकाव झाला असुन आपल्या गावचा मठ पंढरीत असावा या भावनेने गावात व पंचक्रोशीत देणग्या गोळा करुन सार्वजनिक न्यास नोंदणी कायद्यान्वये धर्मदाय संस्था म्हणुन अस्तित्वात आल्या.गावोगावच्या भाविकांकडुन देणग्या गोळा करुन पंढरीत जागा खरेदी करुन मठही उभारले गेले.मात्र पुढे यातही स्वार्थी वृत्तीचा शिरकाव झाल्याने महाराज म्हणून संस्थेचे अध्यक्षपद ग्रहण केलेल्या काही महाभागांनी संस्थेचे अनेक विश्वस्त मयत जाले असतानाही नविन विश्वस्त निवडण्याची प्रक्रियाच राबवीली नसुन त्याच बरोबर संस्थेचा कारभार पाहण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात सादर केलेली घटना (स्किम)पायदळी तुडवत आपण म्हणेल तीच पुर्वदिशा अशा पध्दतीने कारभार सुरु केला आहे.पंढरीत संस्था उभा करताना अशा महाराजांच्या गावातील भक्तांसह इतरी गावातील त्याच्या शिष्यवर्गाने मोठया देणग्या दिलेल्या आहेत.आणि सारेच विश्वस्त एकाच गावचे नसल्याने व त्यांच्यात संपर्काचा असे महाराज हाच दुवा असल्याने कुठल्या विश्वस्ताने संस्थेच्या कारभाराबागत बंड करण्याचाही धोका संभवत नाही.तर अनेक संस्थाधिपतींनी संस्थेवर आपला संपुर्ण कब्जा केला असुन जुने विश्वस्त मयत झाले की या रिक्त ठिकाणी पध्दतशीर आपल्या नात्यागोत्यातील लोकांची व वारसदारांची नावे विश्वस्त म्हणुन घुसडली असल्याचे दिसून येते.
मात्र वारी पुरते चार दिवस पंढरीत येणार्या अनेक देगणीगदार भावकिांना या बदलाची माहीतीच नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे धर्मदाय संस्थेच्या नावाखाली देणग्या गोळा करुन पंढरीत मुंबईत नरिमन पॉईंटच्या तोडीस तोड दराने खरेदी केलेल्या स्थावर मालमत्ता खशात अनेकांचा डाव सद्यातरी यशस्वी झाला आहे.महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या पंढरपूर शहरात मठ,मंदिरे व संस्था यांची संख्या मोठ्या प्रमाणात असुन या संस्थांच्या कारभारावर देखरेख ठेवणार्या धर्मदाय सह.आयुक्तांचे विभागीय कार्यालय पंढरपूरात व्हावे अशी मागणी पंढरीतील संस्था चालक व मठाधिपतींकडुन होताना दिसुन येत आहे.
सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थेखाली नोंदणी झालेल्या सर्वाधीक संस्था पंढरपुर व परिसरात आहेत.तिर्थक्षेत्र असल्याने गेल्या काही वर्षात भक्तीमार्ग,सांगोला रस्ता, टाकळी रोड, भटुंबरे, शेगाव दुमाला, कोर्टी रोड, गोपाळपुर, पंढरपूर शहरा तील उपनगरे या ठिकाणी छोट्या- मोठ्या मठांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.देणग्या गोळा करुनच अनेक मठ अथवा संस्थांनी जागा खरेदी केल्या असुन देणगीद्वारे गोळा झालेल्या रकमेतुन अनेक मठांचे बांधकामही पुर्ण झाले आहे. सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 अर्तंगत अनेक संस्थांनी नोंदणी करुन घेतली आहे.तर अनेक संस्थांच्या जागेत केवळ संस्थेच्या नावाचे फलक आहेत.
सद्या सोलापुर येथील सह.धर्मदाय आयुक्त कार्यालयात पंढरीतील संस्थांबाबतचे अनेक खटले व बदल अहवाल प्रलंबीत असुन अनेक संस्थांचे वार्षिक हिशोब पत्रके दाखलच केले नाहीत तर प्रोसेडींग बुक ही प्रमाणीत केले नसल्याचे दिसुन येते. बदल अहवाल अथवा त्यावरील हरकती या बाबत वर्षानुवर्षे निर्णय होत नसल्यामुळे संस्थाचालकांची मोठी गोची झाली असुन अनेक संस्थांचे बहुसंख्य विश्वस्त मयत असुनही धर्मदाय आयुक्त अशा संस्थाबाबत तातडीने कार्यवाही करीत नसल्याचे दिसुन येते.
जिल्ह्यातील संस्थांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची आहे.संस्थांच्या तपासणीसाठी स्वतंत्र निरिक्षक नेमून कुठल्याही संस्थेची तपासणी करण्याचे अधिकार या कार्यालयास आहेत. वर्षानुवर्षे संस्थांचे वाद प्रलंबीत राहुन संस्थांच्या प्रगतीस खिळ बसत आहे.शहरातील संस्थांची संख्या व येथील संस्थाचालकांच्या अडचणी लक्षात घेऊन पंढरीत धर्मदाय सह.आयुक्तांचे स्वतंत्र कार्यालय होणे गरजेचे झाले आहे.