ताज्याघडामोडी

आई-वडील जिवंत असेपर्यंत संपत्तीवर मुलांचा कोणताही अधिकार नाही

आई-वडिलांच्या संपत्ती प्रकरणी सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जोपर्यंत आई-वडील जिवंत आहेत, तोपर्यंत मुलांचा त्यांच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

एका महिलेने आपल्या पतीची संपत्ती विकण्यासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

पतीच्या संपत्तीचे कायदेशील पालकत्व (मालकी) मिळावी यासाठी सोनिया खान यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. त्यांचे पती दीर्घकाळापासून आजारी असून त्यामुळे त्यांना हा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या या निर्णयाला त्यांचा मुलगा आसिफ खान याने विरोध केला केला आणि वडिलांच्या नावे असलेला फ्लॅट विकण्यास आडकाठी निर्माण केली. आसिफ खान यानेही आई व बहिणींसह न्यायालयात याचिका दाखल केली होती.

आसिफ यांच्या वतीने मागणी करण्यात आली होती की, वडील मानसिक आजाराशी (डिमेंशिया) झुंज देत आहेत, त्यांना अनेकदा झटकेही आले आहेत. आजारपणामुळे वडिलांना अनेकवेळा रुग्णालयात दाखल करावे लागते. वडील आजारी असल्याने ते बाहेर पडू शकत नाहीत तसेच सहीदेखील करू शकत नाहीत. त्यामुळे आपण वडिलांचे कायदेशीर पालक असल्याचे मुलाने न्यायालयाला सांगितले.

तसेच वडिलांच्या संपत्तीचे पालकत्व माझ्याकडे आहे, असे आसिफ याने न्यायालयात सांगितले. आई-वडिलांकडे दोन फ्लॅट असून, एक फ्लॅट आईच्या नावे आहे, तर दुसरा वडिलांच्या नावे. त्यामुळे वडिलांच्या नावे असलेल्या फ्लॅटवर आपला अधिकार असल्याचे आसिफ यांनी न्यायालयात सांगितले. मात्र न्यायालयाने आसिफ यांचा दावा फेटाळला आणि सोनिया यांच्या यांच्या बाजूने निर्णय दिला.

न्यायालयाने काय म्हटले?

दरम्यान, वडिलांची काळजी असल्याचे सिद्ध करणारा एकही पुरावा आसिफ खान यांच्याकडून सादर करण्यात आलेला नाही असं न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती माधव जमादार यांच्या खंठपीठाने याचिकेवर निकाल देताना सांगितलं.

आसिफ खान यांनी केलेले सर्व दाव्यांना कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्याचबरोबर आई-वडील जिवंत असताना मुलं त्यांच्या संपत्तीवर अधिकार सांगू शकतात असं उत्तराधिकार कायद्यात कुठेही म्हटलेले नाही, असेही न्यायालयाने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *