रायगड किल्ल्यावर रायगड प्राधिकरणाकडून करण्यात आलेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिकांकडून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर या कामाची पाहणी करण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी रायगडाला भेट दिली.
जर कामामध्ये चुका होत असतील तर चौकशी झाली पाहिजे असे मत खासदार संभाजी राजे यांनी मांडले. यावेळी त्यांनी शासनाकडून होणाऱ्या दिरगांईचा मुद्दा उपस्थित करीत मी जर यादी बाहेर काढली तर सरकार अडचणीत येईल, असे म्हटले आहे.
संभाजी राजे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना म्हणाले की, पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून जर चुका होत असतील तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि यात दुमत नाही. परंतु, ९९ टक्के काम बरोबर झाले आणि जर एका टक्का चूक दिसली तर एक टक्काच बघायची का? माझ्याकडे यादी आहे, मी काढली तर सरकार अडचणीत येऊ शकते.
हे केव्हा पैसे देतात, किती पैसे देतात, किती वेळात पोहोचतात… पण मी नकारात्मक बोलत नाही. हे टीमवर्क आहे. त्यांच्याही काही अडचणी असतील. ज्या लोकांनी आरोप केलेला आहे त्यांनी माहिती घ्यावी. फंड किती आहे? कार्यकारी अभियंत्यान अजून बिलिंग का दिलेले नाही, याची सुद्धा त्यांनी माहिती घ्यावी.
नुसते एकावर बोट ठेवणे हे काही बरोबर नाही. उलटे आमचे हेच म्हणणे आहे की, तुम्हाला काही वाटले तर, तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगा. येथे चुका व्हायला लागल्या आहेत.
मी नुसता छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज म्हणून नाही, तर मी सगळ्यांशी उघडपणे बोलतो, सगळ्यांसमोर माझे हात उघडे असतात. जर तुम्हाला वाटलेच की येथे सुधारणा करता येऊ शकेल, तर आपण करू. हा काय माझा वन मॅन अजेंडा नाही, असेही संभाजी राजे यांनी म्हटले आहे.