उत्तर प्रदेशात गेल्या दोन दिवसांत कौटुंबिक कारणामुळे दोन व्यक्तींनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत. यातल्या एका प्रकरणात पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून विषारी पदार्थ खाऊन एका व्यक्तीनं आत्महत्या केली.
विशेष म्हणजे या व्यक्तीचं लग्न होऊन जेमतेम 5 दिवसच झाले होते. दुसऱ्या प्रकरणात कुटुंबातल्या वादामुळे एका व्यक्तीने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली. या व्यक्तीला घटनेनंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याविषयीचं वृत्त `लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम`ने दिलं आहे.
उत्तर प्रदेशातल्या मुजफ्फरनगरमधल्या ज्ञानमांजरा गावातल्या मदन कुमार नावाच्या 55 वर्षांच्या व्यक्तीनं शुक्रवारी (19 नोव्हेंबर) कौटुंबिक वादातून स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली. मदन कुमार यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, रुग्णालयात दाखल करताच तेथील डॉक्टरांनी मदन कुमार यांना मृत घोषित केलं, अशी माहिती चारथवाल पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यानं दिली.
दुसऱ्या एका घटनेत मुजफ्फरनगरच्या शामली जिल्ह्यातल्या चूसा गावातल्या 23 वर्षाच्या नवविवाहित युवकानं पत्नी आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून विवाहानंतर अवघ्या 5 दिवसांत विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
शनिवारी (20 नोव्हेंबर) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबरी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात शुक्रवारी ही घटना घडली आहे. मृत व्यक्तीची बहीण सीमा हिने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
मृत तरुण प्रयास (वय 23) याचा 14 नोव्हेंबर रोजी कोमल नावाच्या महिलेशी विवाह झाला होता; मात्र लग्नानंतर 5 दिवसांनी चूसा गावात त्याने आत्महत्या केली. ‘माझी वहिनी कोमल आणि तिचा भाऊ नितीन कुमार हे दोघं माझ्या भावाचा छळ करत होते. या छळाला कंटाळून प्रयासनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे,’ असा आरोप प्रयासची बहिण सीमानं घटनेची तक्रार दाखल करतेवेळी केला आहे, असं पोलिसांनी सांगितलं. पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.