जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह तिच्याच चुलत दिरासोबत भयावह स्थितीत आढळला आहे. दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर करमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत, दोघांचेही मृतदेह रुग्णालयात पाठवले.
पण याठिकाणी डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करत दोघांनाही मृत घोषित केलं आहे. या घटनेची नोंद करमाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
काकासाहेब बबन कदम (32) आणि सत्यभामा अशोक कदम (27) असं मृत पावलेल्या दोघांची नावं आहेत. दोघंही बदनापूर तालुक्यातील राळे येथील हिवरा परिसरातील रहिवासी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सत्यभामा या आठ दिवसांपूर्वी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त आपल्या बहिणीकडे गोलटगाव याठिकाणी आल्या होत्या. तेव्हापासून त्या बहिणीसह बेपत्ता होत्या.
दोन दिवसांपूर्वी बहिणीचा शोध लागला पण सत्यभामा सापडत नव्हत्या. अखेर शुक्रवारी सत्यभामा आणि त्यांचा चुलत दीर काकासाहेब यांचा करमाड याठिकाणी मृतदेह आढळला आहे. दोघांनीही विष प्राशन करून आपल्या आयुष्याचा शेवट केल्याचं उघड झालं आहे. दोघांचे मृतदेह एकमेकांना मिठी मारल्याच्या अवस्थेत आढळून आले आहेत. स्थानिक नागरिकांना दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर त्यांनी या घटनेची माहिती करमाड पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच तातडीने रुग्णवाहिका बोलावून घेत, दोघांनाही चिखलठाणा येथील मिनी घाटीमध्ये दाखल केलं. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केलं आहे.
त्यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आली नाही. पण प्रेम प्रकरणातून त्यांनी आपलं जीवन संपवलं असावं, असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास करमाड पोलीस करत आहेत.