गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रेम प्रकरणाचा वाद विकोपाला, मुलीच्या कुटुबियांनी थेट मुलाला जिवंत जाळलं

प्रेम प्रकरणातून एका तरुणाला मारहाण करत जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात घडलीय.

ब्रेकअपनंतर प्रियकर प्रियसीच्या लग्नाला अडथळे आणत असल्याच्या रागातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेतील सदर युवक 50 टक्के भाजला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात राहणाऱ्या गोरख काशिनाथ बच्छाव या 31 वर्षीय युवकाला मारहाण करत जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. त्याचं तीन वर्षांपासून एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र या प्रेम प्रकरणाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. याच विरोधातून त्यांच्यात ब्रेकअप झाला.

गोरखने ब्रेकअपनंतर त्याची प्रेयसी आणि तिच्या कुटुंबीयांकडे लग्नासाठी आग्रह धरला. मात्र तिच्या कुटुंबियांनी गोरख सोबतच्या लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यांनी तिचं लग्न दुसरीकडे लावून देण्याचा निर्णय घेतला. पण गोरखला ही बाब खटकली. त्याने मुलीचं लग्न जिथे जमेल तिथे ते लग्न तो मोडत सुटला.

याच गोष्टीचा राग मनात धरुन मुलीचे आई-वडील, भाऊ यांनी आज दुपारी बारा वाजता देवळा तालुक्यातील लोहोणेर गावात जाऊन गोरख बच्छाव या तरुणाला मारहाण केली. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

या प्रकरणी देवळा पोलिसांनी संबंधित मुलीसह तिचे वडील गोकुळ सोनवणे, आई निर्मला सोनवणे, भाऊ हेमंत सोनवणे आणि प्रसाद सोनवणे यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *