उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की जेव्हा दंगल होते, तेव्हा प्रत्येक धर्माच्या, पंथाच्या लोकांना त्याचा फटका बसतो. जर हिंदूंची घरं जळाली तर मुस्लिमांची घरं तरी कशी सुरक्षित राहतील. हिंदू सुरक्षित राहिला तर मुसलमान सुरक्षित राहील. आम्ही आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दंगल होऊ दिली नाही.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केलं आहे. ते म्हणाले, १९९० साली आलेल्या काँग्रेसविरोधी लाटेमध्ये अनेक पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचं पाप समाजवादी पार्टीने केलं आहे.
१९९० मध्येच नव्हे तर त्यानंतरही जेव्हा जेव्हा समाजवादी पार्टीला संधी मिळाली, त्यावेळी कोणतीही व्यक्ती सुरक्षित राहिली नाही. समाजवादी पार्टीच्या कार्यकाळात दंगलीच्या आगीत उत्तरप्रदेश जळत होता. आज आम्ही ठामपणे सांगू शकतो की आम्ही उत्तरप्रदेशाला दंगलमुक्त केलं आहे.