भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडी सरकारच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या जणू काही हात धुऊन मागे लागलेले आहेत, असे दिसून येते. या सरकार मधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेले कथित भ्रष्टाचार उघड करण्यासाठी सोमय्या रोजच पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे आरोप करीत आहेत.
आता त्यांच्या निशाण्यावर आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटीलही आले आहेत.
शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी साखर कारखान्यात प्रचंड घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. अजित पवार यांच्या जरंडेश्वर कारखाना घोटाळ्याप्रमाणेच जालन्याच्या अर्जुन खोतकरांनी घोटाळा केला आहे. त्यात विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नी रूपाली विश्वास नांगरे-पाटील, त्यांचे सासरे पद्ममाकर मुळे यांचीही नावे आहेत.
या प्रकरणाची सीबीआय किंवा वरिष्ठ न्यायाधीशामार्फत चौकशी करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली. हिम्मत असेल, तर माझ्या आरोपाचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्जुन खोतकरांनी द्यावे, असे आव्हानही त्यांनी दिले आहे.