एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत टीका केलीय. राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेतली होती. याच पार्श्वभूमीवर औवेसींनी राज ठाकरेंवर टीका केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता अतिशय टोकाच्या शब्दांमध्ये टीका केली. त्यांच्या या टीकेवर आता मनसेकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अकबरुद्दीन औवेसी नेमकं काय म्हणाले?
“कुत्रा आहे, भुंकतोय, जे पण भुंकतोय ते भुंकू द्या. कुत्र्याचं काम भुंकण्याचं आहे. वाघाचं काम शांतपणे चाललं जाणं आहे. बस भुंकू द्या. काहीच गरज नाही. वेळ आणि परिस्थीला समजा. त्यांच्या जाळ्यात अडकायचं नाहीय. ते जाळ गुंफत आहेत. ते तुम्हाला जाळ्यात फसवू इच्छित आहेत. तुम्ही फसू नका”, असा घणाघात अकबरुद्दीन ओवेसी यांनी केला.
“अल्लाला सांगू शकेल मी शाळा काढली. मी जगात कुणालाही घाबरत नाही. फक्त अल्लाला घाबरतो. माझ्यावर हल्ला होण्याआधी माझ्या 2 शाळा सुरु झाल्या. मी आज जिवंत आहे त्या मुलांच्या आशीर्वादामुळे. मुसलमान तरुणांच्या हातात पुस्तक आणि पेन देण्यासाठी राजकारणात आलो. मी 4 वर्ष आमदारकीचा पगार घेतला नाही. त्याच पैशात पहिली शाळा बनवली. खिश्यात पैसे नाहीत पण औरंगाबदची शाळा बनेल. मला अल्ला मदत करेल”, असंदेखील अकबरुद्दीन यावेळी म्हणाले. एका शाळेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
अकबरुद्दीन औवेसी आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आज शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात येत आहे.