चार महिन्यांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकल्यानंतर पती-पत्नीच्या नात्याचा भयंकर शेवट झाल्याची घटना गडचिरोलीत घडली आहे. संसार फुलायला सुरुवातही झाली नाही. मात्र, पतीच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि त्याने क्रूरतेची सगळी मर्यादा पार करत स्वतःच्याच पत्नीची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.
जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात समाविष्ठ श्रीनगर येथील महानंद मधुसूदन सरकार याने त्याची पत्नी खुशी महानंद सरकार वय (१८ वर्ष) ही २९ एप्रिल रोजी परस्पर घरातून निघून गेल्याची तक्रार पोलीस स्टेशन, मुलचेरा येथे दिली होती. त्यानंतर पोलीस शोधमोहीम राबवत असतानाच पती महानंदा सरकार याने १ मे रोजी पोलीस स्टेशन गाठून आपल्या शेतात राहत असलेल्या घराच्या बाजूला विहिरीत पत्नीचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी वरिष्ठांना सदर घटनेची माहिती देऊन पोलीस पथकासह तहसीलदार यांचे सक्षम पंचनामा करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदनानंतर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी तपास करण्यासाठी ठाणेदार अशोक भापकर यांनी चार जणांची तयार केली. घटनास्थळावरील परिस्थिती, दुवे व साक्षीदार यांच्या तपासात खुशी महानंद सरकार हिचा पती महानंद यानेच खून केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी पतीला मुलचेरा पोलिसांनी ताब्यात घेतले असून कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.