ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा घाट : राज ठाकरे

पुणे महानगरपालिकेच्या तयारीसाठी मनसे तयारीला लागली आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या सर्व मतदार संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका होत आहेत.

एका महिन्यात राज ठाकरे यांचा 8 वा पुणे दौरा आहे. आज बोलताना त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, ओबीसी आरक्षण मुद्दा निकालात निघेपर्यंत निवडणूक स्थगिती दिली पाहिजे. पण त्यामुळे हे काम पटकन होणार असेल तर याला स्थगिती मला मान्य आहे. निवडणुका आत्ता नकोत हे सरकारच्या फायद्याचं असेल, त्यात काही काळंबेरं असेल तर तेही आपल्याला समजावून घ्यायला हवं, असं राज ठाकरे म्हणाले. सगळ्या महानगरपालिका सरकारच चालवणार. मग त्यावर प्रशासक नेमणार आणि मग सरकारच बघणार. हे सगळे उद्योगधंदे पण सरकारचे चालू आहेत. मला असं वाटतं की पुढे असं नको व्हायला की ओबीसींचा विषय पुढे करुन सरकार काही गोष्टी साध्य करुन घेत आहे. पण ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या जनगणना वगैरे गोष्टी झाल्यानंतर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

प्रशासक नेमून महानगर पालिकांवर वचक ठेवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. राज्य सरकारलाच महानगरपालिका निवडणूक घेण्याची इच्छा नाही. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणूका लांबणीवर टाकण्याचा घाट घातला जातोय, असे आरोप राज ठाकरे यांनी केले आहेत. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून तिथे माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. जातिनिहाय जनगणनेबद्दल विचारणा झाली असता राज म्हणाले, खरंतर ही काही अवघड गोष्ट नाही. अशा प्रकारची जनगणना करण्यासाठी सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे.

राज ठाकरे म्हणाले की, राजकीय कार्यक्रम होतात गर्दी होते. त्याद्वारे कोरोना पसरत नाही. मात्र दहीहंडी,गणेशोत्सव साजरा केला की पसरतो. मी गणेशोत्सव मंडळांशी बोलणार आहे, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, मंदिर उघडण्याची मागणी पण होतेय आणि केंद्र सरकार सणासुदीला गर्दी करू नका म्हणतंय. एकूण सगळ्या सरकारांचं बरं चाललंय. सगळं बंद हे त्यांना आवडतंय, असंही ते म्हणाले.

तिसरी लाट, चौथी लाट म्हणत लोकांत भीती पसरावयची असं सुरु असल्याचंही ते म्हणाले. लसीकरण होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करायला नको, असंही ते म्हणाले. 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांना लस देता येणार नाही असं पूनावाला म्हणालेत.. लसीकरण झालं की कॉलेज सुरू करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *