सोलापूर:डिझेलची बचत व्हावी आणि प्रदूषण कमी व्हावे या हेतूने एसटी महामंडळाने इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. नियत तयार करा, अशा प्रकारचे आदेश महामंडळाने सर्व जिल्ह्यांतील विभाग नियंत्रकांना पाठवले आहेत. यात राज्यातील महत्त्वाच्या ३२ विभागांचा समावेश करण्यात आला आहे. या नव्या विचाराने प्रवासी सुखावणार असून डिझेल महागाईच्या दृष्टीने बचत आणि विजेवर चालणारी वातानुकूलित एसटी बस आल्याने प्रदूषण कमी अशा दुहेरी फायद्याची अमलबजावणी लवकरच केली जाणार आहे.
याबाबतचे आदेश सर्व विभाग नियंत्रकांना पोहोचले असून सर्वच विभागात याबाबत नियोजन सुरू झाले आहे. तेव्हा आता महाराष्ट्रात डिझेलवर नव्हे, तर विजेवर धावणाऱ्या एसटी अनुभवायला मिळणार आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.इलेक्ट्रिक बससंदर्भात राज्यातील विविध विभागात तांत्रिक विभागाने भेट देऊन चार्जिंग पॉइंटच्या संदर्भात पाहणी केली. प्रत्येक जिल्ह्यानुसार विभाग ठरवून त्या त्या टप्प्यांवर कशा पद्धतीने याचे नियोजन करता येईल याचीदेखील पाहणी करण्यात आली आहे.
३०० किलोमीटरचा प्रवास करणे सहज शक्य होणार आहे. यासाठी ९० आणि १५० किलो वॅट अशा चार्जिंगची आवश्यकता याकरिता भासणार आहे. याकरिता महावितरण एसटी महामंडळाला मदत करणार आहे. प्रत्येक विभागात स्वतंत्र जशी गरज असेल तशी किमान १००० किलोवॅट अॅम्पियरची गरज असणार आहे.