ताज्याघडामोडी

पंढरपूरच्या लॉकडाऊनला हॉटेल असोसिएशन संघटनेचा तीव्र विरोध

 कोरोना महामारीमुळे आधीच हॉटेल व्यवसायिक अडचणीत आलेले असून अद्याप ही ते त्यामधून सावरलेले नाहीत. गेल्या दीड वर्षापासून सतत लॉकडाऊनचा त्रास सहन करावा लागत आहे. वास्तविक पाहता पंढरपूर शहर हे आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी या चार यात्रांवर जगणारे व अर्थकारण चालणारे शहर आहे हे सर्वांनाच माहित आहे. त्यातच श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे मंदिर बंद असल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची संख्याही कमी झालेली आहे.त्यामुळे येथील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यातच बाहेर गावाहून आणलेले कामगार यांना रहायची सोय, जेवणाची सोय व त्यांचे पगार देताना या हॉटेल व्यावसायिकांना नाकीनाऊ आलेले आहे. कसाबसा व्यवसाय करून या कामगारांसह आपला उदरनिर्वाह चालवित असतानाच सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांनी दिनांक 8 ऑगस्ट 2021 रोजी एक लॉकडाऊनचा नवीन आदेश काढला असून शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट 2021 पासून पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद राहणार असल्याचा आदेश दिलेला आहे. यामुळे हॉटेल व्यावसायिकांना फार मोठा धक्का बसला असून यामुळे आणखी किती दिवस असा अन्याय सहन करायचा असा प्रश्न आता या व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे सदरचा लॉकडाऊनचा निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे, अशी माहिती हॉटेल असोसिएशन संघटनेचे दत्तासिंह राजपूत यांनी दिलेली आहे.
वास्तविक पाहता यापुर्वीच्या लॉकडाऊनच्या काळात देखील लाईट बील, पंढरपूर नगरपरिषदेचा कर, दुकान गाळ्याचे भाडे हे आम्ही अडचणीत असतानादेखील भरलेले आहे. असे आता नव्याने जिल्हाधिकारी यांनी पंढरपूर, सांगोला, माढा, माळशिरस व करमाळा या पाच तालुक्यांसाठी लॉकडाऊनचा आदेश काढलेला आहे. यामुळे आणखीणच अडचणीत वाढ झालेली आहे. व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडणारा आदेश असल्याचे यातून दिसून येते. वास्तविक पाहता पंढरपूर शहर व तालुक्याचा विचार केला तर शहरात रूग्ण संख्या कमी आहे व ग्रामीण भागात सुमारे 100 गावे असताना त्यातील काही गावांमध्येच कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे यामुळे केवळ या तालुक्यातील काही गावांमुळे संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्याला वेठीस धरणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ज्या गावात कोरोना रूग्ण वाढले आहेत त्या ठिकाणी प्रतिबंधक क्षेत्र जाहीर करावे त्यास आमचा पाठींबा असेल. 
मात्र संपूर्ण पंढरपूर शहर व तालुक्याला पुन्हा वेठीस धरणे बरोबर असणार नाही. याचा प्रशासनाने फेरविचार करावा कारण मुंबई व पुणे या ठिकाणी देखील रूग्ण संख्या वाढत असताना त्या ठिकाणी सर्व दुकाने उघडण्यास प्र्रशासनाने मंजूरी दिलेली आहे मग आपल्या सोलापूर जिल्ह्यातच दुसरा नियम कशासाठी असा प्रश्न आता व्यापाऱ्यांतून उपस्थित केला जात असून प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्या मंगळवार दिनांक 10 ऑगस्ट 2021 पासून आंदोलन करण्यात येणार असून दिनांक 13 ऑगस्ट नंतरही  सर्व हॉटेल व्यावसायिक आपली दुकाने चालूच ठेवणार आहोत असा इशारा ही देण्यात आलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *