राज्यात राष्ट्रवादी, शिवसेना व कॉंग्रेस या तिन्ही पक्षाचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. मात्र या तिघांमध्ये अनेक वेळा काही मुद्यांवरून मतभेद होताना दिसून येतात. यामध्ये शिवसेना व कॉंग्रेसमध्ये अनेक वेळा अनेक मुद्यांवरून वाद झाल्याचे बघायला मिळाले आहे. मात्र यावेळी शिवसेना व राष्ट्रवादी आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले आहे.
माकडीनही गरज पडली की पिल्लाला बुडवते, आम्हीही राष्ट्रवादीला बुडवू, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना खासदार संजय जाधव यांनी केले आहे. परभणीच्या जिल्हाधिकारी अंचल गोयल यांच्या नियुक्तीवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात वाद झाल्याचे दिसून येत आहे.
संजय जाधव म्हणाले की, शेवटी आम्ही आता खूप सहनशक्तीच्या पलीकडे गेलोय. जिल्ह्यामध्ये कलेक्टर बदलायचा होता. मी फक्त मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली होती. पण त्या राष्ट्रवादीने एवढं रानं केलं की, जसं काही मोठा अपराध केला होता. तुम्हाला सगळं जमलंय. म्हणजे, आपलं घ्यायचं झाकून अन् दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी अवस्था या राष्ट्रवादी वाल्याची झाली आहे.
शेवटी काही मर्यादा असतात, कुठपर्यंत शांत बसायचं. कुठपर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीन सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पायाखाली घालते. तेव्हा राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू, हे लक्षात ठेवा, असे संजय जाधव आपली नाराजी व्यक्त करत म्हणाले आहेत.