ताज्याघडामोडी

पंढरपूर शहर तालुक्यातील केवळ ११२० ‘श्रीमंतांनी’ सोडला अन्न सुरक्षा योजनेचा लाभ

1 लाख 52 हजार 727 नागरिकांना मिळणार मोफत धान्य

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून पात्र रेशन कार्डधारकांना वर्षभर मोफत धान्य उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत तालुक्यातील 1 लाख 52 हजार 727 नागरिकांना जानेवारीपासून मोफत धान्य वितरण केले जात आहे. यासाठी महिन्याला तालुक्यात सुमारे 353 टन गहू व 516  टन तांदूळ असे एकत्रित 869 टन धान्य वाटप करावे लागणार असल्याची माहिती तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांनी दिली.   

पंढरपूर तालुक्यात ग्रामीणमध्ये 116 तर शहरात 30  असे एकूण 146 रेशन दुकान आहेत. अंत्योदय योजनेत 5 हजार 713 कार्डधारक असून 21 हजार 506 लोकसंख्या आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत 32 हजार 701 कार्डधारक असून 1 लाख 31 हजार 221 लोकसंख्या आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013  अंतर्गत अंत्योदय कार्डधारकास  प्रतीकार्ड 15 किलो गहू 2 रुपये किलो दराने व 20 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने अंत्योदय कार्डधारकास दिले जात होते. तसेच अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती 2 किलो गहू 2 रुपये दराने व 3 किलो तांदूळ 3 रुपये किलो दराने दिले जात होते. जानेवारी 2023 पासून अंत्योद्य योजनेतील  प्रत्येक कार्डधारकाला 15 किलो गहू 20 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. तर अन्नसुरक्षा योजनेत प्रतिव्यक्ती 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे.      

  केंद्र आणि राज्य सरकारकडून प्राधान्यक्रम योजनेच्या लाभ घेण्यासाठी  शहरी भागात कुटंबाचे वार्षिक उत्पन्न ५९ हजार तर ग्रामीण भागात ४४ हजार रुपये अशी  अट विहित करण्यात आलेली आहे.ज्या शिधा पत्रिका धारकांचे वार्षिक उत्पन्न वर नमूद केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांनी स्वतःहून अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडत असल्याचे फॉर्म भरून द्यावेत असे आवाहन ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले होते.तसेच विहित मर्यादेपेक्षा जास्त उप्तन्न असलेले शिधापत्रिका धारक जर अन्न सुरक्षा योजनेतून स्वतःहून बाहेर पडणार नसतील तर कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागू शकतो.हेही सूचित करण्यात आले होते.तरीही पंढरपूर शहर तालुक्यातून आता पर्यत केवळ ११२० लाभार्थी या योजनेतून स्वखुशीने बाहेर पडले आहेत.पंढरपूर शहरातून हा लाभ सोडणाऱ्यांची संख्या तर अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे.त्यामुळे आता विहित उत्पन्नापेक्षा जास्त उत्त्पन्न असतानाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिका धारकांवर कारवाई होणार का ? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.        पंढरपूर तालुक्यातील शिधा पत्रिका धारकांकडून अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडत असल्याचे फॉर्म भरून घेण्याची जबाबदारी संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे सोपविण्यात आली होती तर पंढरपूर शहरातील उप्तन्न मर्यादेचा भंग करणाऱ्यांचे फॉर्म तलाठी भरून घेणार कि संबंधित स्वस्त धान्य दुकान चालक या बाबत संभ्रम असल्याचे दिसून आले होते.     

अन्न सुरक्षा योजनेस पात्र असलेले परंतु स्वस्त धान्य दुकानातून धान्य न उचलणाऱ्या कुटूंबाची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात असून या बाबत तपासणी मोहीम हाती घेणे गरजेचे झाले आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *