ईडीनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे. ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे असे मानले जात असून या कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहारांची न्यायालयातही सुनावणी सुरू असतानाच ईडीने हि कारवाई केली आहे. राज्य सहकारी बँकेने या कारखान्याचा काही वर्षांपूर्वी लिलाव केला होता.माजी आमदार आणि माजी महलूसलमंत्री शालिनीताई पाटील यांच्या अधिपत्याखालील कारखान्यावर कारवाई झाल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तर लिलाव प्रक्रियेनंतर अजित पवार यांनी आपल्याकडून हा कारखाना बळकावल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला होता.
राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या चौकशी प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट देत विशेष न्यायालयात नुकताच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. पण अजित पवारांवर आरोप झालेल्या काही मुद्यांवर पुन्हा एकदा चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. अत्यंत अल्प दरात या कारखान्यांची विक्री केली गेली आणि यातले काही कारखाने बँकेवर संचालकपदी असलेल्या नेत्यांच्या नातेवाईकांनी विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आणि गृह खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडेच असल्याने पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टवर प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.