ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार?

नागपूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्य सरकारने टाळेबंदीची घोषणा केली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याबाबत उच्च न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढत, निर्णय कसा घेतल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांवर पुन्हा अभ्यास सुरू करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. मात्र, आता पालक आणि विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नसल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षीही कोरोनामुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता.यंदाही मार्च महिन्यापासून कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. एप्रिल महिन्यात तर बाधित आणि मृत्यूदर प्रचंड वाढला होता. त्यामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. तर राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.

परीक्षा रद्द प्रकरणी याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने राज्य सरकारवर चांगलेच ताशेरे ओढत, हा निर्णय कसा घेतला? यासंदर्भातील सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करावे, अन्यथा हा सरकारने घेतलेला परीक्षा रद्दचा निर्णयच रद्द करू, असे सुनावले आहे. त्यामुळे दहावीच्या परीक्षा पुन्हा होणार काय? अशी चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. तेव्हा परीक्षा रद्द झाली म्हणून विद्यार्थ्यांनी ठेवलेली पुस्तके काढून पुन्हा अभ्यास करण्याची वेळ येईल का? या चर्चेलाही उधाण आले आहे.

बोर्डाची तयारी

कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य समोर ठेवून दहावी परीक्षा रद्दचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य मंडळाची तयारी ही जूनमध्ये परीक्षा घेण्याची होती. सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तयार आहेत. त्यामुळे न्यायालयाने परीक्षा घेण्यासंदर्भात निर्णय घेतला तरी राज्य मंडळाची तयारी पूर्ण असल्याचे विभागीय शिक्षण मंडळाच्या प्रभारी सचिव माधुरी सावरकर यांनी दिली.

शाळांची धावपळ वाढणार

परीक्षा पुन्हा घेण्यासंदर्भात निर्णय आल्यास शाळांची धावपळ वाढणार आहे. बोर्डाद्वारे शाळास्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, यासाठी शाळांना काळजी घ्यावी लागणार आहे.

विद्यार्थ्यांना वेळ देण्याची गरज

राज्याने विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी कोरोना रुग्णसंख्या जास्त असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही. शिवाय ज्यातून मन निघाले त्यात पुन्हा मन लावणे सोपे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळ देण्याची गरज असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सरिता मोडक यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *