पंढरपूर– ‘आपण नेहमी म्हणतो की ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे पण त्यादृष्टीने कृती होताना सहसा दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ च्या दरम्यान ‘उन्नत भारत’ अभियानाची घोषणा केली. त्यानुसार त्यांनी सर्व खासदारांनी कमीत कमी एक ते दोन खेडी दत्तक घ्यावी व त्यांचा विकास करावा असा विचार मांडला होता. एआयसीटीईने देखील शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ही योजना पुढे नेली. संशोधनातून ग्रामीण भागातील सरासरी उत्पन्न वाढले पाहिजे ही त्यामागची भूमिका आहे. त्यादृष्टीने स्वेरीमध्ये सुरु असलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे. पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी मला स्वेरीच्या कार्याची थोडक्यात ओळख करून दिली होती. डॉ.प्रशांत पवार हे माझे विद्यार्थी आहेत. त्यांचे मला कौतुक करावेसे वाटते. कारण त्यांनी ठरवले असते तर ते आयआयटी, एनआयटी सारख्या संस्थेमध्ये कार्य करू शकले असते. परंतु उच्च शिक्षण घेवूनही त्यांनी पंढरपूर सारख्या ग्रामीण भागाची त्यांनी निवड केली आणि त्यांचे उत्तम कार्य सुरु आहे. तंत्रज्ञानातून शेती उत्पादन वाढले पाहिजे व लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर थांबवले पाहिजे. एकूणच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामीण भागाचा विकास करणे ही काळाची गरज आहे.’ असे प्रतिपादन ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात एआयसीटीई चे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे यांनी केले.
स्वेरीमध्ये आयोजिलेल्या ‘टेक्नोसोसायटल– २०२०’ या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून एआयसीटीईचे चेअरमन डॉ. अनिल सहस्त्रबुद्दे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर तंत्रपरिषदेचे समन्वयक डॉ. प्रशांत पवार यांनी प्रास्तविकात तंत्रपरिषदेचा मुख्य उद्धेश, देश विदेशातून सहभागी असलेले संशोधक व शास्त्रज्ञ, प्राप्त झालेले शोधनिबंध आदी बाबत माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी ऑनलाइन उपस्थित असलेले शास्त्रज्ञ, संशोधक, प्राध्यापक यांचे स्वागत करून स्वेरीच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतच्या वाटचालीबाबत संपूर्ण माहिती दिली. या तिसऱ्या आंतराष्ट्रीय परिषदे साठी डॉ.विजय जोशी (ऑस्ट्रेलिया), हे प्लेनरी स्पीकर व प्रमुख उदघाटक म्हणून लाभले होते. त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ (जो भारतातील पद्मविभूषण या पुरस्काराच्या दर्जाचा आहे) हा पुरस्कार मिळालेला आहे. ‘हायवे/ रोड बिल्डींग अॅन्ड इनोव्हेशन’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ.विजय जोशी म्हणाले की ‘भारताच्या विकासासाठी हातभार लावणे हे माझे कर्तव्य समजतो. ऑस्ट्रेलिया, जपान, न्यूझीलंड, आयलँड, भारत या विविध देशात मी कार्य केलेले आहे. पंढरपूर सारख्या ग्रामीण भागात संशोधन आणि विकासास हातभार लावण्याचे कार्य स्वेरी च्या माध्यमातून सुरु आहे. हायवेचा दर्जा उंचावण्यासाठी कुशल पद्धतीचे तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे.’ या ऑनलाईन आयोजिलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘कि नोट स्पीकर’ म्हणून विविध देशातील संशोधक व अभ्यासक सहभागी आहेत. डॉ. थॉमस मबुया (नैरोबी), बोतीर उस्मानोव्ह (उझबेकिस्तान), डॉ.एस.पी. अरुण (भारत), डॉ. यल्लोजी राव (अमेरिका), डॉ. मृणालिनी पत्तर्कीन (अमेरिका), या परिषदेसाठी जवळपास ३०० प्राध्यापक व संशोधकांनी नोंदणी केली असून जवळपास ३५० संशोधनपर लेख सबमिट करण्यात आलेले आहेत., सर्व संशोधनपर लेख हे ‘स्प्रींजर’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केले जाणार आहेत.’ देशी-परदेशी व भारतीय शास्त्रज्ञ या ‘टेक्नो-सोसायटल २०२०’ च्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी नॅशनल हायवे ॲथोरिटी ऑफ इंडिया‘चे डेप्युटी जनरल मॅनेजर शिवाजी पवार म्हणाले की, ‘स्वेरीमधील शैक्षणिक उपक्रम अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहेत. पंढरपूरच्या ग्रामीण भागांमध्ये भविष्यामध्ये मोठ-मोठे प्रकल्प उभे राहतील असा विश्वास असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील तसे आश्वासन दिले आहे.’ असे सांगून तंत्रज्ञानातील संशोधनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘बुक ऑफ ॲबस्ट्रॅक्ट’ चे उदघाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, जेष्ठ संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी. रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. या समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. एम.एम. भोरे यांनी केले.