सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा – आमदार प्रशांत परिचारक
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे संपुर्ण जिल्ह्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहत
होते. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात १९० मिली मीटर पर्यंत पावसाचे नोंद झालेली आहे.
यामध्ये नदीकाठची हजारो एकर पिके पाण्याखाली गेली, शेताच्या जमिनी खचल्या, चारा व धान्य
पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहुन गेल्याने, घरांचे नुकसान झाले त्यामुळे नागरीकांचे व शेतकऱ्यांचे
प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नुकसानीची झालेली
व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व नागरीकांना थेट मदत देण्यात यावी.
अशी मागणी जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजित पवार
यांचेकडे लेखीपत्राद्वारे केली.
सोलापूर जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना या पुराचा फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांची द्राक्ष, ऊस, डाळींब, केळी, कांदा
आदी पिकांना या पावसाच्या व पुराच्या पाण्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसानास सामोरे जावे
लागले. यासर्व बाबींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात झाले.
पंढरपूर शहरातील भीमा नदीकाठच्या नागरीकांच्या घरात, वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने
घरातील सामानाची, जीवनावश्यक वस्तुंची, घरांची पडझड झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान
झाल्याने नागरीकांचे घरे चिखलमय झाली. त्यामुळे त्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला.
वरील सर्व बाबींचा विचार करता आमदार प्रशांत परिचारक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री
मा.अजित पवार पंढरपूर येथे शनिवार दि.१७ ऑक्टोंबर २०२० आले असता त्यांच्याकडे
लेखीपत्राद्वारे मागणी केली आहे की, सोलापूर जिल्हा व परिसर ओला दुष्काळ म्हणून जाहीर
करून लवकरात लवकर नागरीकांना, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी.