वाळू चोरांची आता गय नाही,थेट पुण्याहून आलेले पथक करणार कारवाई ?
पोलीस,महसूल आणि आरटीओ विभागाने घेतली दखल
महसूलच्या स्थानिक बेजबाबदार कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणार ?
सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरणाच्या ऱ्हासाचे कारण पुढे करत पर्यावरण विभागाने घेतलेल्या आक्षेपानंतर वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया ठप्प झाली आहे.मात्र जिल्ह्यातील नदीकाठच्या गावालगत असलेल्या नदीच्या पात्रातून वाळू घाटांचे लिलाव पूर्वीप्रमाणे होत नसले तर येथील वाळू साठे मात्र गायब होत असून ज्या ठिकाणच्या वाळू घाटाचा दोन -पाच कोटींना जात होता त्याच ठिकाणी आता वाळू ऐवजी केवळ वाळूतील खडी शिल्लक असल्याचे दृश्य मागील काही वर्षात पहावयास मिळत होते.सोलापूर जिल्ह्यात विशेषतः पंढरपूर तालुक्यात नदीकाठच्या अनेक ज्या गावालगतच्या भीमा नदीच्या पात्रातील वाळू लिलाव कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळवून देत होते त्या पैकी अनेक गावात आता शासनास मिळणारा अधिकृत महसूल भीमेच्या पात्रात बुडवून अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार सातत्याने जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईत उघड झाले आहे.
पंढरपूर तालुक्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले हे तालुक्यात प्रगतीपथावर असलेल्या अनेक महामार्गाच्या भूसंपादनाचा किचकट प्रश्न मार्गी लावून,भरपाईचे अनेक वादग्रस्त दावे सामोपचाराने मिटवून तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या महामार्गाच्या व कोरोनाच्या प्रसारास रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनात व्यस्त असताना महसूल विभागाचे जबाबदार कनिष्ठ अधिकारी व विविध गावातील महसूलचे कर्मचारी मात्र आपल्या अधिकार क्षेत्रातील अवैध वाळू उपशाबाबत बोटचेपी भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे.एखाद्या गावाच्या हद्दीतील नदीच्या पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाची खबर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अथवा तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळते मात्र हीच बाब आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी निवासी राहण्याची अट असल्यामुळे गावातच मुक्कामास असलेल्या संबंधित तलाठी,मंडल अधिकारी,पोलीस पाटील यांना कसा काय समजत नाही हेच एक मोठे कोडे आहे.अनेक वेळा पोलीस कारवाईत अवैध वाळू उपसा होत असल्याने झालेल्या कारवाईतील वाहने पोलीस ठाण्यातून परस्पर कोर्टात दाखल परवानगी अर्जानुसार सुटतात मात्र सदर पोलीस कारवाई झाल्याची माहिती घेऊन महसूल प्रशासनाने दंडात्मक कारवाईसाठी सदर वाहनावर कारवाई सुरु केल्याचे उदाहरण अतिशय विरळ आहे.
पुणे जिल्ह्यात विविध बांधकामाच्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातून अवैधरित्या उपसा झालेली वाळू रात्रीतून पोहोच होत असल्याची कुणकुण लागल्यानेच आता पुणे जिल्ह्यातून एक विशेष पथक थेट सोलापूर जिल्ह्यात येऊन कारवाई करणार असल्याचे वृत्त एका आघाडीच्या वुत्तपत्रात प्रकाशित झाल्यानंतर सोलापूर जिल्हयातील नदीकाठच्या वाळू उपसा करून थेट ”पुणे डिलिव्हरीचे” स्टेट्स जपणाऱ्या वाळू माफियांची झोप उडणार आहे एवढे निश्चित.