ताज्याघडामोडी

जे आमदार-खासदार करू शकत नाहीत ते राजू शेट्टी यांनी करून दाखवलंय !

जे आमदार-खासदार करू शकत नाहीत ते राजू शेट्टी यांनी करून दाखवलंय !

शेतकरी धर्म विसरू नका, स्व.शरद जोशी सुरु केलेली हि चळवळ पोरकी होईल !

(पंढरी वार्ता विशेष:- राजकुमार शहापूरकर )

मला आठवते नुकतेच माझे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले होते आणि निवांत असल्यामुळे याच पंढरपूर शहरातील कट्टा विद्यापीठात मी एडमिशन घेतले होते. त्यावेळी देशाचे पंतप्रधान म्हणून पी.व्ही.नरसिह राव हे पंतप्रधान होते तर मनमोहन सिंग हे अर्थमंत्री होते.आणि त्याच वेळी डंकेल प्रस्ताव आला होता.या डंकेल प्रस्तावाबाबत देशभरात जसा नाराजीचा सूर होता तसाच समर्थनही करणाऱ्या बुद्धिजीवी वर्गाची संख्या कमी नव्हती.डंकेल प्रस्तावानुसार जगभरात या करारावर सही करणाऱ्या देशांनी कृषी क्षेत्राला देण्यात येणारी थेट सबसिडी मर्यादित करण्याबरोबरच कृषी मालाच्या आंतराष्ट्रीय पातळीवरील आयात आणि निर्यात यावरील निर्बंध हि पूर्णपणे हटविण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.त्या मुळे जगभरात भारता सारख्या कृषी आधारित अर्थव्यवस्थेवर अवलंबून असलेल्या अनेक देशांतील शेतकरी चळवळीत या बाबत मोठा वाद -विवाद होताना दिसून आला.पण राज्यसभेची खासदारकी आणि विधानपरिषदेची आमदारकी नाकारत शेतकरी चळवळीचे अर्ध्वयू स्व. शरद जोशी यांनी या बाबत आपल्या शेतकरी संघटनेच्या वतीने अतिशय समर्पक मुद्दे उपस्थित करीत शेतकऱ्याच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले.आणि तेव्हा पासूनच शेतकरी संघटनेचा बिल्ला खिशावर मिरवणारा फार मोठा शेतकरी वर्ग या राज्यात दिसू लागला.सत्तेसाठी राजकारण करणारे नेते आपले तारणहार नसून आपणास आपला हक्क हा संघर्ष करूनच मिळवावा लागेल हि भावना अनेक शेतकऱ्यांमध्ये दृढ झाली आणि राज्यात शेतकरी संगठना मजबूत होत गेली. आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खासदार राजू शेट्टी हे याच शेतकरी संघटनेतून पुढे आलेले नेते आहेत.आणि जेव्हा जेव्हा निवडणुकीचे गणित नसते तेव्हा तेव्हा याच स्वाभिमानी शेतकरी संघटनेबद्दल सामान्य शेतकरी अतिशय आपुलकी व्यक्त करताना दिसतो हे त्रिवार सत्य आहे.
राज्यात विधानसभा आणि विधान परिषद हि १९६० पासून कार्यरत आहे.२८८ आमदार विधानसभेत जातात आणि ७५ आमदार विधानपरिषदेत जातात या पैकी लक्षवेधी आणि राज्यव्यापी प्रशांवर भांडतात किती जण ? काही मोजक्याच आमदारांनी विधिमंडळात सामान्य जनतेच्या प्रशांसाठी,शेतकऱ्याच्या प्रशांसाठी संघर्ष केला आहे,सत्ता कोणाचीही असो आवाज उठवला आहे हे विसरून चालणार नाही.काही नेते असे असतात कि ते आमदार/खासदार असले काय आणि नसले काय त्यांचे जनतेच्या मनातील स्थान कधीही डळमळीत होत नाही.मग ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सेनापतीची भूमिका निभावले स्व.प्र.के. अत्रे असोत अथवा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या हितासाठी अथक आणि अभ्यासपूर्ण परिश्रम घेणारे स्व. शरद जोशी असोत.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे असेच एक सर्वमान्य नेतृत्व असून आमदार खासदार पद याच्या पुढे गेलेले नेतुत्व आहे.
या माणसाचा प्रचंड उत्साह मी अगदी जवळून पहिला आहे का तर मी पंढरपूर-बारामती आंदोलनात त्याच्या समवेत शेतकरी नसतानाही चार पावले चाललो आहे.त्यावेळी आमचे पत्रकार मित्र शिवाजी हलनवर यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आणि हे शेतकरी नाहीत तर संपादक असल्याचे सांगितले त्यावेळी त्यांनी आशचर्य व्यक्त करीत तुम्ही का चालताय ? असा प्रश्न केला होता त्यावेळी मी त्यांना एकच उत्तर दिले होते.आपण ज्या तळमळीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताय ते योग्य आहेत म्हणून मनाला समाधान वाटावे म्हणून चालतोय,कि या लढ्यात आपणही चार पावले चाललो होतो.
आमदारकी हि राजू शेट्टी यांच्यासाठी गौण बाब आहे पण ज्यांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत अंतर्विरोधकाचे ते कदाचित स्वप्न असावे,आणि राजू शेट्टी आणि शेतकरी संघटना हि स्वप्नपूर्तीचे साधन. बाह्य विरोधकांचे म्हणाल तर शेतकरी संघटनेचे आंदोलनांचे हत्यार म्यान राहिले पाहिजे आणि सर्वमान्य शेतकरी नेता मौन राहिला पाहिजे हि तर प्रस्थापित राज्यकर्त्यांची थिअरी आहे.
२०११ साली खा. राजू शेट्टी यांनी ऊस गळीत हंगाम सुरु होण्याच्या तोंडावर ऊस दरासाठी ऊस परिषदांचे आयोजन करण्यास सुरुवात केली. साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसाला किती दर द्याचा याचा निर्णय तो पर्यंत हेच ऊसउत्पादक शेतकरी सभासद मालक असूनही चेअरमन आणि संचालक मंडळ घ्यायचे.तो निर्णय घेण्यासाठी आता ”स्वाभिमानी” किती मागणी करतेय याचा अंदाज घेतला जाऊ लागला.आणि मी ठामपणे सांगतो कि केवळ आणि केवळ राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनामुळे गेल्या ८ गळीत हंगामात केवळ सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पदरात ६ हजार कोटी रुपये जास्त पडले आहेत.
मी शेतकरी नाही पण एक पत्रकार म्हणून मला एवढे कळून चुकले होते आणि आहे कि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तळमळीने लढणारा नेता हा सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठीही डोकेदुखी असतो.त्यामुळेच हे प्रस्थापित नेते कधी पदाचे अमिश दाखवून,कधी फूट पाडून शेतकरी चळवळ आपल्या कह्यात ठेवायला पाहतात कारण अजूनही महाराष्टात लोकसभा असो अथवा विधानसभा शेतकरी आणि त्यांचे प्रश्न हा निवणूक काळात कळीचा मुद्दा असतो आणि प्रस्थापित राज्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या प्रशांवर पोटतिडकीने भांडणारा बोलणारा नेता हा अडसर वाटत असतो.
या माध्यमातून मा. खासदार राजू शेट्टी यांना मी एकच सांगू इच्छितो,गेल्या साठ वर्षात महाराष्ट्रात जवळपास ४ हजार व्यक्ती आमदार झाल्या या पैकी किती नावे आपल्या प्रशांसाठी भांडणारा नेता म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या स्मरणात आहेत ? आपण आमदार झाला न झाला,खासदार झाला न झाला या राज्यातील शेतकऱ्यांना याच्याशी देणेघेणे नाही आपण स्वाभिमानाने शेतकरी हिताची आपली चळवळ पुढे नेली हीच त्यांची अपेक्षा आहे आणि एक पत्रकार म्हणून आपल्या या पुण्यकार्यात माझ्यासारखे अनेकजण तुमच्या सोबत असणार आहेत !
– राजकुमार शहापूरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *