औरंगाबादच्या नामांतरावरून महाविकास आघाडीत एकमत नसताना, विशेषत: शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका वेगवेगळी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र या विषयावर वेगळेच भाष्य केले आहे. आमच्यात वाद नसून संभाजीनगर म्हणा, धाराशिव म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा, या प्रकरणाकडे मी गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे या विषयावर मी कधीही भाष्य केलेले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. त्यानंतर त्यावरून नवा वाद निर्माण झाला होता. हा वाद सुरू असतानाच आता उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव असा करण्यात आल्याने या वादात भर पडली आहे.औरंगाबादच्या नामांतराबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका कायम आहे. आम्ही ती वेळोवेळी मांडलेली देखील आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आम्ही आमची भूमिका पटवून देऊ, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.
या विषयात औरंगजेब हा मुद्दा नाही. छत्रपती संभाजी महाराज हे आमचेही आराध्यदैवत आणि श्रद्धास्थान आहे. नामांतराच्या बाबतीत जे राजकारण होते, त्यामुळे माणसात भेद निर्माण होतात. ते होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाचा विरोध आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.