परप्रांतीय मजुरांसाठी पंढरपूरातून विशेष श्रमिक एक्सप्रेस रेल्वे गाडी सोडा
शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना साकडे
खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून पाठपुरावा
केंद्र सरकारने लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर रेल्वे व इतर वाहनाद्वारे प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.गेल्या ४५ दिवसापासून अनेक परप्रांतीय मजूर पंढरपुर शहर व तालुक्यात अडकून पडलेले होते.या सर्व ११३२ मजुरांसाठी पंढरपुरातील विशेष निवारा केंद्रात निवासाची व भोजनाची सोय करण्यात आली होती. राज्यातील अनेक शहरातून श्रमिक एक्स्प्रेसच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येत आहेत.अशीच रेल्वे गाडी पंढरपूरातून सोडली जावी असे नियोजन स्थानिक प्रशासनाकडून केले असतानाही केवळ रेल्वे विभाग व तामिळनाडू सरकारच्या दुर्लक्षामुळे हि गाडी सोडण्याबाबत निर्णय होत नव्हता.हि गंभीर बाब शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा केली व या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांच्याशी बोलणे गरजेचे असल्याचे सांगितले.या बाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतील अशी माहिती खा. विनायक राऊत यांनी जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांना दिली आहे.
या बाबत अधिक माहिती देताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले कि,पंढरपुरात विविध ठिकाणी आश्रयास असलेल्या परप्रांतीय मजुरांची राहण्याची व भोजनाची चांगली सोय प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती.मात्र आता या मजुरांना आपल्या घराकडे परतण्याची ओढ लागली आहे.इतर ठिकाणाहून रेल्वे गाड्या सोडल्या जात असताना त्यांचा संयम सुटत चालला आहे.स्थानिक प्रशासन रेल्वे विभागाशी सातत्याने सम्पर्कात असतानाही गाडी सोडण्याबाबत निणर्य होत नाही हे पाहून आपण खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करत असल्याची माहिती संभाजी शिंदे यांनी दिली आहे.