१० रुपयात थाळी योजना केंद्र निवडीचे अधिकार तहसीलदार,बीडीओ आणि न.पा. मुख्याधिकाऱ्यांच्या हाती !
हॉटेल,खानावळ चालक व महिला बचत गटांना प्राधान्य
झुणका भाकर केंद्राप्रमाणे सार्वजनिक जागा बळकावू इच्छिणाऱ्यांचा भ्रमनिरास
राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्याचे आश्वसन निवडणूक प्रचाररम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते.या आश्वासनाची पूर्तता करीत शासनाने हि योजना पहिल्या टप्प्यात जिल्हा स्तरावर राबिवण्याचा निर्णय घेतला असून तीन महिने अभ्यास करून पुढे हि योजना तालुकास्तरावर राबविली जाणार आहे.या शिवभोजन केंद्राच्या संचालनाबाबत नियम आणि अटींची घोषणा आज शासनाने केली असून त्यानुसार सदर शिवभोजन केंद्र चालकाकडे स्वतःची अथवा दीर्घकालीन भाडेतत्वावर जागा असणे बंधनकारक आहे.यासाठी रेस्टोरंट चालक,खानावळ चालक व महिला बचत गट यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.तर शासकीय जिल्हा रुग्णालये, बसस्थानक,बाजारपेठ,शासकीय कार्यालय आदी ठिकाणांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
शिवभोजन योजनेच्या प्रस्तावित केंद्रचालकाकडे एकावेळी २५ व्यक्तीची बसण्याची व्यवस्था असणे बंधनकारक आहे व जास्तीत जास्त १५० लोकांनाच १२ ते २ या वेळेत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.(बहुतेक गरिबांनी एकभुक्त रहावे असे शासनास वाटत असावे ). सुरुवातीच्या तिमाहीत सोलापूर जिल्ह्यास प्रतिदिन ७०० थाळीची कमाल मर्यादा आहे. तीन महिने प्रायोगिक तत्वावर जिल्ह्याच्या ठिकाणी हि योजना राबविली जाणार असून त्यानंतर तालुकास्तरीय शिवभोजन केंद्राबाबत निवडप्रक्रिया होणार आहे. यासाठी शासनाने तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि नगर पालिका मुख्याधिकारी(सचिव) अशा प्रकारे त्री सदस्य समिती नियुक्त केली जाणार आहे.आणि केंद्र चालक निवडीचे अधिकार या समितीकडे असणार आहेत.