पोलीस उपाधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्या आवाहनामुळे पंढरपूरकांना दिलासा
आता विनाप्रश्न दाखल करून घेतली जाणार मोबाईल चोरीची तक्रार ?
पंढरपुर शहरात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी सातत्याने मोबाईल चोरीच्या घटना घडत आल्या आहेत.पंढरपूर शहरातील बाजार पेठेतील भाजी विक्रीचे ठिकाण व पंढरपूर बसस्थानक हे मोबाईल चोरांसाठी पीक अप पाईंट ठरले होते.गेल्या काही वर्षात शहरातून अनेकांचे मोबाईल चोरीस गेले खरे पण या चोरीची तक्रार करण्यास शहर पोलीस ठाण्यात गेल्या नंतर तक्रार दाखल करून घेण्यास अनेक सामान्य नागिरकांना अतिशय वाईट अनुभव अनेकवेळा आला असल्याचे दिसून आले.ज्याचा मोबाईल चोरीस गेला आहे त्याचा थेट एफआयआर दाखल करून घेण्याऐवजी सध्या कागदावर तकार लिहून घेणे आणि शोध घेण्याचे आश्वासन देऊन पाठवणे असा प्रकार गेल्या काही वर्षात घडत होता.
आज पंढरपूर शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी आपल्या पद्धतीने माहिती मिळवून मोबाईल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.या बाबत माहिती देताना पंढरपूरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. सागर कवडे यांनी पत्रकारांना माहिती देताना या टोळी कडून सुमारे साडेचार लाख किमतीचे ५५ मोबाईल जप्त करण्यात आल्याचे सांगितले आहे त्याच बरोबर मोबाईल चोरीची तक्रार दाखल करा असे आवाहनही केले आहे.
पोलीस उपाधीक्षक डॉ.सागर कवडे यांच्या तक्रार दाखल करण्याच्या आवाहनामुळे शहरातील नागिरकांमधून समाधान व्यक्त केले जात असतानाच मोबाईल चोरीची तक्रार दाखल करण्यास पोलीस ठाण्यात गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांकडून या पूर्वी आलेल्या अनुभवामुळे अनेकांनी तक्रारीचा पाठपुरावा करणे देखील सोडून दिले आहे त्या नागिरकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने १ जानेवारी पासून मंदिरात मोबाईला नेण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याची चर्चा राज्यभरात झाल्यामुळे शहरात दर्शनासाठी आलेले भाविक हे आपल्या चारचाकी वाहनातच पूर्वीप्रमाणे मोबाईल ठेवतील पण पंढरपुर शहरात नगर पालिकेच्या अधिकृत पार्किगच्या ठिकाणी जसे भाविक वाहने लावतात तसेच आरोग्य कर आणि पार्किंग फी वसुलीच्या ठेकेदाराच्या सोयीस्कर दुर्लक्षामुळे शहरातील अनेक ठिकाणी तसेच नो पार्किंगच्या बोर्डच्या शेजारीही आपले वाहने लावतात.सदर ठेकेदाराचे अभिकर्ते हे केवळ पावती फाडण्यापुरते कर्तव्य पार पाडत असल्यामुळे पार्किंग फीची पावती फाडूनही अनेक भाविकांच्या वाहनातून चीजवस्तू व मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत.एवढेच काय तर भाविकांचे वाहने चोरीस गेल्याचीही घटना घडल्या आहेत.त्या मुळेच आता तरी पंढरपुर शहर पोलीस ठाणे आपल्याला सन्मानाची वागणूक देत मोबाईल व अन्य वस्तूंच्या चोरीची तक्रार दाखल करून घेईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.