महाविकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भारतीय जनता पक्षासोबत सरकार बनविण्याची तयारी होती, अशी माहिती शिवसेनेचे नेते (ठाकरे गट) संजय राऊत यांनीच आम्हाला दिली असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या शिष्टमंडळासोबत राज्यातील काही विषयांवर चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास गेले होते. या भेटीनंतर ठाकरे यांच्या मनात भाजप सोबत जाऊन सरकार बनविण्याचा विचार सुरु झाला होता.
त्यानंतर संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या भेटीची वेळ मागितली होती. राऊत यांनीच आम्हाला याबाबत माहिती दिली होती. बैठकीला एकनाथ शिंदे, तसेच मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते,” असेही त्यांनी सांगितले.