ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्राकडे पाठ फिरवणाऱ्या पावसाने सप्टेंबरमध्ये जोरदार पुनरागमन केलं. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, दोन दिवसांपासून पुन्हा राज्याकडे पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाऊस कधी परतणार? असा प्रश्न बळीराजाला पडलाय.
अशातच हवामान खात्याने राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या गुरूवारपासून राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस कोसळणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळेल, असा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आला आहे.हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, मंगळवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. पुढील दोन दिवस राज्यात हवामानाची स्थिती अशीच राहील, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरातील संभाव्य कमी दाबाचे क्षेत्र पोषक ठरल्याने शुक्रवारपासून राज्याच्या अनेक भागात पाऊस वाढण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहेतर मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये हलका पाऊस होईल. मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसण्याचा अंदाज IMD कडून देण्यात आला आहे.