हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात येत्या २ ते ३ दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस होसाळीकर यांनी दिली आहे. डॉ. होसळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर या दोन दिवसात राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळेल. यावेळी वातावरणामध्ये हलकासा गारवाही असेल.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तसेच विदर्भातही समाधानकारक पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारपर्यंत राज्यातल्या कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये येलो अलर्ट असणार आहे. यावेळी सर्वच भागात मुसळधार पाऊस पडेल तर ७ सप्टेंबरला विदर्भाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे नागरिकांनी आपल्या शेतीच्या कामांना हाती घेण्याआधी हवामानाचा अंदाज घ्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो तीव्र होत असल्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याचं पाहायला मिळतं. आजपासून ८ सप्टेंबरपर्यंत ३ दिवसात राज्यातल्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळेल अशी माहिती हवामान खात्यातील दिली आहे. यावेळी विदर्भाला ऑरेंज तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.