राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यातील अंबरनाथमध्ये दोन दिवसांपूर्वी एक युवक वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरु होता. अखेर त्याचा मृतदेह उल्हासनगरमध्ये वालधूनी नदीच्या काठावर आढळला आहे. राहील उर्फ काळू शेख असं मृत तरुणाचं नाव आहे.
अंबरनाथमध्ये दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. अंबरनाथ स्थानकापासून थोड्या अंतरावर राहील उर्फ काळू शेख त्याच्या मित्रांसह पोहण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचे मित्र बाहेर निघाले मात्र राहील शेख पाण्यात वाहून गेला होता. अं बरनाथ मधील जुना भेंडी पाडा परिसरात राहील उर्फ काळू शेख हा वास्तव्यास होता.
दोन दिवसांपूर्वी तो नाल्यामधून उल्हासनगर शहराच्या दिशेत वाहत गेला होता. याबाबतची माहिती अंबरनाथ पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. त्यानंतर दोन दिवस त्या तरुणाचा शोध सुरु होता.राहील शेख या तरुणाचा मृतदेह उल्हासनगरच्या वालधुनी नाल्यात सापडला आहे. गेले दोन दिवस पावसाचा जोर कायम असल्यानं राहील शेखचा मृतदेह सापडला नव्हता. आता दोन दिवसांनंतर पावसाचा जोर कमी झाल्यावर आज सकाळच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प नंबर ३ येथील लोकमान्य टिळकनगर परिसरातील वालधूनी नदीच्या काठावर एका तरुणाचा मृतदेह मिळाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी मध्यवर्ती पोलिसांना दिली.