मध्य प्रदेशच्या मुरेना जिल्ह्यातील अंबाहमध्ये वडिलांनी लेकीचा आणि तिच्या प्रियकराचा खून केला. हे प्रकरण ऑनर किलिंगचं असल्याची माहिती तपासातून उघडकीस आली आहे. मुलीच्या वडिलांनी दोघांची हत्या करुन त्यांचे मृतदेह चंबळ नदीत फेकले. या नदीमध्ये मगरींची संख्या अधिक आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस चंबल नदीच्या रेह घाटावर पोहोचले. स्थानिक पाणबुडे आणि एसडीआरएफच्या पथकांकडून चंबळ नदीपात्रात मृतदेहांचा शोध सुरू आहे. मुरेनातील अंबाहमधील रतन बसई गावात राहणाऱ्या १८ वर्षांच्या शिवानी तोमरचे शेजारच्या गावात वास्तव्यास असलेल्या २१ वर्षीय राधेश्याम तोमरशी प्रेमसंबंध होते. दोघे ३ जूनपासून बेपत्ता होते. कुटुंबियांनी दोघांचा बराच शोध घेतला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस तक्रार दाखल केली. पोलीस १५ दिवसांपासून त्यांचा शोध घेत होते.
राधेश्यामची हत्या झाल्याचा संशय त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी शिवानीच्या कुटुंबियांची कसून चौकशी केली. तेव्हा संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. शिवानीच्या वडिलांनी दोघांची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी आणि राधेश्याम ६ मे रोजी घरातून पळाले. त्यांचा शोध घेतला असता, ११ मे रोजी ते उत्तर प्रदेशात सापडले. पोलिसांनी दोघांच्या कुटुंबियांशी संपर्क साधून त्यांना परिवाराच्या ताब्यात दिलं.
तुझ्या भावाला समज दे, त्याला गावापासून दूर कुठे तरी पाठव, अन्यथा परिणाम वाईट होतील, अशी धमकी शिवानीच्या वडिलांनी १ जूनला राधेश्यामचा भाऊ घनश्याम तोमरला दिली होती. ‘३ जूनला राधेश्याम आणि शिवानी बेपत्ता झाले. आम्ही त्यांचा शोध सुरू केला. पोलिसांना धमकीबद्दल सांगितल्यानंतर त्यांनी शिवानीच्या वडिलांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली,’ असं घनश्यामनं सांगितलं.