ताज्याघडामोडी

तुझ्याशी बोलायचं आहे; डोळ्यात अन् नाका-तोंडात चटणी कोंबली; प्रेम प्रकरणातून बेदम मारहाण; तरुणाचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणाला नियोजित कट करून घरी बोलावून त्याच्या डोळ्यात, अंगावर मिरची पावडर टाकून अमानूष मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. औसा तालुक्यातील भादा येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. बळीराम नेताजी मगर (वय २५) असं मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे.

३ जून रोजी भादा येथील आनंदनगर चौकात थांबलेल्या बळीरामला गावातीलच निखिल व्यंकट फरताळे याने “तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे”, असं सांगून आपल्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यावर निखिलच्या मामासह आई, आजी, आजोबा आणि इतर नातेवाईकांनी संगणमत करून बळीरामला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

बळीरामच्या डोळ्यात, नाका-तोंडात तसेच अंगावर मिरची पावडर टाकली. या अमानुष बेदम मारहाणीने बळीराम बेशुद्ध होऊन पडला. ही घटना माहित होताच बळीरामच्या नातेवाईकांनी त्याला बेशुद्धावस्थेत लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. १५ दिवस मरणाशी सुरू असलेली त्याची झुंज अखेर थांबली अन् त्याचा उपचारादरम्यान काल शनिवारी मृत्यू झाला.

दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर मारहाणीचा व्हिडिओ सात दिवसांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला. भादा पोलिसांनी बळीरामच्या नातेवाईकांशी संपर्क साधून तक्रार दाखल करून घेत एका महिलेसह सात जणांना अटक केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोंगरे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *